निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची तक्रार : 20 लाखाचा निधी पाण्यात : आमदारांची सूचना धूडकावून मनमानी
खानापूर : येथून जवळच असलेल्या रामगुरवाडी येथील संपर्क रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पंचायतराज इंजिनिअरिंग खात्याकडून करण्यात आला होता. हा नव्याने करण्यात आलेला रस्ता अवघ्या एक महिन्यातच उखडला. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. या कामाची लोकायुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी रामगुरवाडी येथील युवकांनी केली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तालुक्यातील सहा संपर्क रस्त्यांचे नुकतेच डांबरीकरण केले आहे. रामगुरवाडी गावचा संपर्क रस्ताही या योजनेतून नव्याने करण्यात आला होता. 19 मार्च रोजी हे काम पूर्ण करण्यात आले. अवघ्या एक महिन्यात रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यावरून या रस्त्याच्या कामाचा दर्जा स्पष्ट होतो. खानापूर-जांबोटी रस्त्यापासून रामगुरवाडी शाळेपर्यंत 830 मीटरचा हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याचा आराखडा होता. या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 20 लाख रु. चा निधी मंजूर झाला होता.
खडीकरणाचे काम रोहयोतून
खडीकरणाचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले होते. यासाठी 10 लाखांचा निधी देण्यात आला होता. डांबरीकरणाचे काम आर. के. ट्रेडर्स यांनी केले. डांबरीकरण करतेवेळी ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत आक्षेप घेतला होता. त्यांनी रस्त्याचे काम योग्यरीतीने व्हावे, यासाठी इंजिनिअर व कंत्राटदाराशी चर्चा केली होती. मात्र, कंत्राटदाराने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता अवघ्या महिन्याभरातच उखडला आहे. रामगुरवाडी येथील संदीप धबाले, प्रमोद मोटर, किरण मोटर, बाबू शिंदे, तुकाराम ठोंबरे, संजय ठोंबरे, विशाल सावंत यांनी याबाबत दाद मागणार असल्याचे सांगितले.
मात्र तरीही कंत्राटदाराची मनमानी रस्त्याचे काम सुरू असताना आम्ही तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती. आमदारांनी कंत्राटदाराला काम उत्तम दर्जाचे करण्याची सूचना केली होती. मात्र, तरीही कंत्राटदाराने मनमानी करून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने हा रस्ता पावसाआधीच उखडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.