पुणे/ प्रतिनिधी :
जगभरात सध्या आर्थिक मंदीचे सावट राहून असून, या आर्थिक मंदीची झळ देशाला पोहचू नये, असा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक मंदी आलीच, तर ती जूनमध्ये येईल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे सांगितले.
जी-20 कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राणे म्हणाले, जी-20 या जागतिक परिषदेचे उद्घाटन माझ्या हातून होत असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज वेगाने प्रगती करत आहे. येत्या 10 वर्षांत भारत आर्थिक स्तरावर तिसऱया क्रमांकावर जाईल. सध्या सबंध जगावर मंदीचे सावट आहे. असे असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. भारताला व देशातील नागरिकांना मंदीची झळ बसू नये, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याला यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. तरीही मंदी आलीच, तर ती जूनमध्ये येऊ शकते.
शहरांचे स्वरूप कसे असावे, याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल. महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले, की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही. मी 32 वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत, तर केवळ दृष्टिकोन बदलतो, असे मतही राणे यांनी नोंदविले.