जान्हवी अन् रणवीर सिंह झळकणार
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट ‘तेजाब’च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. 1988 मध्ये निर्मित या चित्रपटाचा रिमेक तयार केला जाणार आहे. दिग्दर्शक मुराद खेतानी यांनी या चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. रणवीर सिंह आणि जान्हवी कपूर या जोडीला घेऊन खेतानी हा चित्रपट तयार करणार आहेत. यापूर्वी कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूर हे या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती.
‘तेजाब’ हा अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एन. चंद्रा यांनी केले होते. या चित्रपटात त्यावेळी 4 फिल्मफेअर चित्रपट पटकाविले होते. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अनिल-माधुरीच्या जागी रणवीर आणि जान्हवी कपूर ही जोडी दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणवीर आणि जान्हवी हे एकत्र काम करणार आहेत.
खेतानी यांनी तेजाबच्या रिमेकसाठी आता वेगाने पावले टाकली आहेत. तेजाबच्या कथेत ते आता सध्याच्या काळानुसार बदल करणार असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण मे महिन्याच्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची निवड नव्या कथेनुसार केली जाणार आहे.