धर्मवीर संभाजी चौकात पादचाऱयांना अडथळा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील स्मार्टसिटी योजनेतील रस्त्याची कामे व्यवस्थित झाली नसल्याने नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जोडण्यात आलेले काँक्रीटचे रस्ते वाहनधारकांना अपघातास कारणीभूत ठरत असल्याने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र धर्मवीर संभाजी चौकातील दुरुस्तीचे काम करून फुटपाथवर मातीचे ढिगारे ठेवण्यात आल्याने पादचाऱयांना अडचणीचे ठरत आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत प्रमुख रस्त्याचे काँक्रीटीकरण करून फुटपाथ निर्माण केले आहेत. पण काँक्रीटीकरण करताना जोडणी केलेल्या रस्त्यामध्ये फटी निर्माण झाल्याने दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः चौकामध्ये असलेले रस्ते वाहनधारकांना जीवघेणे बनले असल्याने याबाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. गोगटे चौक, धर्मवीर संभाजी चौक तसेच विविध ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या फटी बुजविण्यासाठी पेव्हर्स घातले आहेत. याकरिता ठिकठिकाणी रस्ता फोडून काढला होता. काही ठिकाणी असलेले पेव्हर्सदेखील खराब झाले होते. काढण्यात आलेले पेव्हर्स आणि मातीचे ढिगारे धर्मवीर चौकातील फुटपाथवर ठेवले आहेत. त्यामुळे पादचाऱयांना अडथळा निर्माण झाला आहे. तीन ठिकाणी ढिगारे ठेवल्याने पादचाऱयांची गैरसोय होत आहे. हे ढिगारे याठिकाणी पडले असून याकडे स्मार्टसिटीच्या अधिकाऱयांचे, कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे.