बिहारचे कृषिमंत्री सुधाकर यांनी सोडले पद ः राजद-संजदमध्ये वादाची ठिणगी
वृत्तसंस्था / पाटणा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नाराजी जगजाहीर झाल्यावर बिहारचे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना स्वतःच्या राजीनाम्याचे पत्र रविवारी सोपविली आहे. तत्पूर्वी त्यांनी ‘कृषी विभागात सर्व चोर असून मी त्या चोरांचा सरदार आहे’ असे वक्तव्य केले होते. स्वतःच्या वक्तव्यांमुळे ते सातत्याने वादात सापडले होते.
बिहारमधील महाआघाडी सरकारच्या स्थापनेला केवळ 32 दिवसच झाले असले तरीही आतापर्यंत दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मंत्री हे राजदच्या कोटय़ातील होते. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी माजी कायदा मंत्री कार्तिक सिंह यांनी राजीनामा दिला होता. कार्तिक सिंह यांना अपहरणाच्या एका खटल्यात न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले होते.
बिहारच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. याप्रकरणी आता कुठलाही राजकीय संघर्ष होऊ नये अशी आमची इच्छा आहे. राज्य सरकार सुरळीत चालावे म्हणून सुधाकर सिंह यांनी राजीनामा दिला असल्याचे राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे सुधाकर सिंह हे जगदानंद सिंह यांचे पुत्र आहेत.
2 महिन्यात दुसरी विकेट
भाजप नेते सुशील कुमार मोदींनी ट्विट करत 2 महिन्यांमध्ये बिहार सरकारची दुसरी विकेट गेली असून नितीश कुमार यांची आणखी फजिती होणे शिल्लक असल्याची टीका केली आहे. ही लढाई आता जगदानंद विरुद्ध नितीश कुमार अशी बदलली आहे. पुढील विकेट जगदानंद सिंह यांचीही असू शकते असे सुशील मोदींनी म्हटले आहे.
नितीश कुमार होते नाराज
नितीश-तेजस्वी सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले सुधाकर सिंह यांनी स्वतःच्या विभागातील अधिकाऱयांना चोर आणि स्वतःला चोरांचा सरदार म्हटले होते. त्यंच्या या विधानामुळे राजद-संजदमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे मानले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजेंडय़ावर चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुधाकर सिंह यांना सुनावल्याचे समजते. सुधाकर सिंह यांनी स्वतःच्याच सरकारमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला होता.