प्रतिनिधी /बेळगाव
विजयनगर ते गणेशपूरला जाडणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून अडचणीचा ठरू लागला आहे. परिणामी हा रस्ता कोणाच्या हद्दीत येतो यावरुन मोठा गदारोळ माजला आहे. परिणामी याबाबत आरटीई कार्यकर्ते नागेश माने यांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. आता या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पंचायतराज खात्याकडे सदर तक्रार सोपविली आहे.
विजयनगर-गणेशपूर पाईपलाईन रोड हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. येथून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान हा रस्ता हिंडलगा ग्राम पंचायतीकडे येतो असे सांगून महानगरपालिकेने हात वर केले होते तर ग्राम पंचायतीने हा रस्ता आपल्या हद्दीत येत नसून महानगरपालिकेच्या हद्दीत येतो असे सांगितले. त्यामुळे हा रस्ता नेमका कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱयांनी पंचायतराज खात्याकडे सदर तक्रार वर्ग केली. या परिसरातील विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. हद्दीचा वाद सोडून हा रस्ता करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता मागील 7 ते 8 वर्षांपासून दुर्लक्षित आहे. तातडीने विचार करुन रस्त्याचे काम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.