पाणी नसल्याने बंद अवस्थेत : देखभालीअभावी पाणपोईचे अस्तित्व संपुष्टात
प्रतिनिधी /बेळगाव
नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पाणपोई उभारण्यात आल्या होत्या. पण देखभालीअभावी पाणपोईचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सध्या शुद्ध पाण्याची मागणी असल्याने स्मार्ट सिटीत आरओ प्लांटची उभारणी करण्यात आली. पण हे प्लांटदेखील काही महिन्यातच बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल बनले आहे.
शहरात पाणीटंचाईची समस्या उद्भवत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. विशेषतः बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना आणि व्यापारीवर्गाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात आरओ प्लांट उभारण्यात आले आहेत. मात्र पाण्याअभावी हे आरओ प्लांट बंद अवस्थेत आहेत. सध्या विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याचे पाणी मुबलक मिळत नाही. पावसामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांटचा आधार घेत आहेत. पण आरओ प्लांटमध्ये देखील पाणी नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून धर्मवीर संभाजी चौक, नरगुंदकर भावे चौक, श्रीनगर गार्डन, न्यायालय आवार, गोवावेस अशा विविध ठिकाणी आरओ प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. पण पाणीटंचाईच्या काळातच पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. प्लांटची देखरेख करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराचे आहे. पण प्लांट उभारणी केलेल्या काही महिन्यातच बंद पडू लागल्याने भवितव्य काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहर आणि उपनगरात उभारण्यात आलेले आरओ प्लांट खराब झाले असून खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला आहे. आरओ प्लांटकरिता खर्ची घालण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्यात यावी. तसेच आरओ प्लांट सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.