लोणावळा / प्रतिनिधी :
लोणावळा-पवनानगर या रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून अर्धवट राहिले आहे. मागील पंधरा दिवस लोणावळा व पवनानगर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने या मार्गावरील दुधिवरे खिंड परिसरातील रस्ता वाहून गेल्याने याठिकाणी चढ व उतारावर वाहने चालविताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर दुसरीकडे वाहून गेलेली खडी काही ठिकाणी एकत्र जमा झाल्याने त्याठिकाणी वाहनांचे टायर जागेवर फिरत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रातील पहिला हायब्रिड अँन्युटी रस्ता म्हणून तत्कालीन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले होते. दोन वर्षात या रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात चार वर्ष होऊन गेली, तरी रस्त्याचे निम्मेदेखील काम पूर्ण झालेले नाही. वन विभागात जागेची अडचण, नागरी भागात रस्ता रुंदीकरणातील अडथळे, विजेचे खांब, पाण्याच्या लाईन अशा अनेक कारणांमुळे हे काम लांबले असल्याचे सांगितले जात आहे. दुधिवरे खिंडीचे रुंदीकरण करण्याचे काम नव्याने निविदा काढत एका कंपनीला देण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर ते काम सुरू होईल.
मात्र, तूर्तास नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा, याठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पवन मावळातील गावांना लोणावळा शहराशी जोडणारा हा मध्यवर्ती रस्ता आहे. शनिवार व रविवार लहान पर्यटक वाहने या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात जात असतात. या सर्वांनाच या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करत आहेत.
हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार