अतिक्रमण करणारे भाजी विक्रेते-फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाई करण्याची मागणी : गर्दीतून पादचारी-वाहनधारकांनी जायचे कसे?
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेतील फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी सातत्याने उपक्रम हाती घेतले जातात. मात्र चार दिवसांनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गणपत गल्ली परिसर बाजारपेठेचा असला तरी या रस्त्यावर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. या रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग, त्यानंतर बैठ्या विक्रेत्यांची गर्दी आणि त्यामधून फिरणाऱ्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या या गर्दीमधून पादचाऱ्यांनी आणि वाहनधारकांनी जायचे कसे? असा मुद्दा उपस्थित होत आहे. बाजारपेठेत गणपत गल्ली कॉर्नर ते नरगुंदकर भावे चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांच्या रांगा लागलेल्या असतात. रस्त्याशेजारी थांबण्याऐवजी रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या लावत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
गणपत गल्लीतील फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि रहदारी पोलीस खात्याच्यावतीने अनेकवेळा कारवाई करण्यात आली. मात्र केवळ दोन-तीन दिवस शिस्तीचे पालन केले जाते. त्यानंतर पुन्हा ये-रे माझ्या मागल्या, अशी स्थिती निर्माण होते. फेरीवाल्यांना आणि बैठ्या विक्रेत्यांना पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये बसण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र याचे पालन केले जात नाही. त्यामुळे फेरीवाल्यांच्या या डोकेदुखीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या
रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहने पार्क केली जातात. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना वाहने लावण्यासाठी जागा नसते. त्यामुळे वाहनांच्या मागेच अस्ताव्यस्तपणे दुचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे फेरीवाल्यांच्या हातगाड्या, फळविक्रेते आणि अशातच दुचाकी वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्ता व्यापत आहे. पादचारी किंवा अन्य वाहनधारकांना मार्ग काढताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एखादे चारचाकी वाहन गणपत गल्लीत आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होते.
प्रवासी रिक्षाचालकांची मनमानी
फेरीवाल्यांच्या या विळख्यात सापडलेल्या गणपत गल्लीमध्ये प्रवासी रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. प्रवासी मिळविण्यासाठी ते गणपत गल्लीमधून हळू रिक्षा चालवत जात असतात. एखाद्या प्रवाशाने हाक दिल्यास त्याच ठिकाणी रिक्षा थांबवितात, परिणामी मागे वाहनांच्या लांब रांगा लागतात. या मार्गावर सर्वांचीच मनमानी वाढली असून शिस्त लावण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.