सोशल मीडियावर रोप वे ला प्रचंड नकार, उडवली उपक्रमाची खिल्ली
प्रतिनिधी/ सातारा
अजिंक्यताऱयावर रोपवे होणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरु झालेली आहे. त्या विरोधात सोशल मीडियावर जोरदारपणे नाय… नो… नेव्हर…चा मारा सुरु झालेला आहे. पहिला रखडलेला रस्ता दुरुस्ती करावा. रस्त्याच्या कामास मुहूर्त केव्हा लागणार अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच 15 वर्षापासून मंजुरीचे दहा कोटी नेमके कुठे मुरले अशी चर्चा रंगू लागली आहे. अजिंक्यताऱयाला जाणारा रस्ता साधा झाला नाय, रोप वे कसला करताय, असे म्हणत सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत असून उपक्रमाची अक्षरशः खिल्ली उडवली जात आहे.
सातारा शहर ज्या किल्याच्या पायथ्याशी वसवले आहे तो किल्ला म्हणजे अजिंक्यतारा. याच किल्यावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. परंतु एकच रस्ता असून तो रस्ता चांगला पक्का करावा अशी मागणी कित्येक वर्षापासून होत आहे. दहा वर्षापासून नुसत्याच घोषणा सुरु आहेत. याच रस्त्यावरुन पर्यटकांची बस दरीत जाता-जाता वाचली होती. त्यावेळीही पुन्हा घोषणा झाल्या होत्या. त्यानंतर रस्ता मंजूर झाला पण या रस्त्याच्या कामात अठरा विघ्ने आली. अजून हा रस्ता पूर्ण झाला नाही. तोच रोप वे च्या प्रस्तावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यावरुन सोशल मीडियावरुन जोरदारपणे नाय… नो.. नेव्हर…चा नारा रंगू लागला आहे.
सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे प्रताप अंबवले म्हणताहेत, अजिंक्यतारा किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा तयार करण्यात यावा, त्यामुळे ऐतिहासिक पर्यटनात भरच पडणार आहे. तर रोप वे बाबत राजेंद्र शिंदे यांनी अजिबात नाही, इम्रान शेख याने नो, शैलेश मोरे याने अहो इथं किल्यांमधील तलावांची डागडुजीसुद्धा लोकांच्या श्रमदानातून होते तिथे तुम्ही डागडुजीचा विचार तर सोडाच अन् हित रोप वे म्हणजे साडी चोळी नाय पण हातभर गंठण पाहिजे असा प्रकार झाला आहे.
नंदकिशोर निपाणे यांनी अजिबात नाही असे म्हटले आहे. उद्धव पवार यांनी गरज नाही, त्याऐवजी किल्याची पडझड झालेली दुरुस्ती करावी. तर तेजश्री पाटील हिने पडझड दुरुस्ती कशी करावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर प्रशांत मोदी यांनी तर संपूर्ण साताऱयात वाहतुकीचा खेळखंडोबा झाला लक्षात घेता पार मंगळवार तळय़ापासून माहुलीपर्यंत रोप वे ची गरज आहे. तेवढेच क्रेनचा ताण कमी होईल.
विजय माने म्हणालेत, प्रत्येक बुरुजाची डागडुजी केली पाहिजे. मी गेली 17 वर्ष किल्यावर जातो. दूरदर्शन, बीएसएनलमध्ये नोकरी केली आहे. रोज पाच लिटरचा पाण्याचा कॅन घेऊन जायचो. येणारे पर्यटक पाण्यासाठी रिक्वेस्ट करायचे. आम्हाला पाणी नको पण आमच्या लहान मुलांना अर्धा ग्लास पाणी द्या. पण माणुसकी म्हणून पाणी दिले आहे. तर सांगायचे म्हणजे सर्व सोयी प्रथम झाल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.