जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता तब्बल सहा महिन्यांनंतर अंतिम टप्प्यात : कोट्यावधीचा निधी वाया
बेळगाव : सरकारी कामे ही अत्यंत संथगतीने होत असतात. याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या जातात. मात्र चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यालाच तब्बल सहा महिने लागले. नेहमी अधिकाऱ्यांची वर्दळ असलेल्या या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने पार पडले असून आता जवळपास हे काम पूर्णत्वाला आले आहे. रस्ता झाला. मात्र न्यायालयाला ये-जा करण्यासाठी जो भुयारी मार्ग आहे त्याचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात न्यायालयात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. यासाठी तब्बल सव्वाकोटी ऊपये खर्च करण्यात आले. पण आता हा भुयारी मार्ग केवळ शोभेची वस्तू बनला असून या ठिकाणी लावण्यात आलेले ट्युबलाईट्स चोरट्यांनी चोऊन नेले आहेत. सध्या हा भुयारी मार्ग बंदच आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे काम पूर्णत्वाला आल्याने भुयारी मार्गही सुरू होईल, अशी आशा होती. मात्र त्याबाबत अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
कामाचे ढिसाळ नियोजन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्त्याबरोबरच पार्किंग तसेच इतर गाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तेही काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या ठिकाणी नेमके काय होणार हे समजणे अवघड झाले आहे. सध्यातरी कामाचे ढिसाळ नियोजन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात या परिसराचा विकास होणार की नाही, हे समजणार आहे. मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयाकडे वकिलांना तातडीने जाण्यासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली. न्यायालयाच्या या मुख्य रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. यामुळे या रस्त्यावऊन ये-जा करणे अवघड बनत आहे. या ठिकाणी अपघातही घडले आहेत. त्यानंतर वकिलांनी भुयारी मार्गाची मागणी केली. यासाठी आंदोलनेही करण्यात आली. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने भुयारी मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.
भुयारी मार्ग म्हणजे अडगळीचे ठिकाण
सध्या ज्या ठिकाणी भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणांऐवजी न्यायालयाच्या आवाराकडे हा भुयारी मार्ग हवा होता, अशी मागणी वकिलांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीत भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली. यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागला होता. त्यावेळी या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. वाहनचालकांना यासाठी लांबचा फेरा मारावा लागत होता. यामध्ये वेळ आणि पेट्रोलही अधिक लागत होते. मात्र त्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले. पण आता हा भुयारी मार्ग अडगळीची वस्तू बनली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील लुक बदलणे अवघड
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील विकास कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र अशाप्रकारे अनेक इमारतीही अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील लुक बदलणे तसे अवघडच झाले आहे. या ठिकाणी वारंवार मोर्चे तसेच आंदोलने होत असतात. या आंदोलनासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या खुल्या जागेमध्ये मोर्चेकरांना जागा करून देण्यात आली आहे. मात्र ही सर्व जागा खुली असल्यामुळे एक तर उन्हात किंवा पावसात मोर्चेकरांना थांबावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रयत्नदेखील अयशस्वी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भुयारी मार्गातील ट्युबलाईट्सची चोरी
य् ाा भुयारी मार्गात फरशी बसविण्यात आली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बाजुने गटारी काढून त्यावर लोखंडी झालर बसविण्यात आली होती. अंधारात ये-जा करणाऱ्यांसाठी तब्बल 10 ट्युबलाईट्स बसविण्यात आल्या होत्या. भुयारी मार्ग आकर्षित दिसावा यासाठी स्टीलचे किमती पाईप्सही बसविण्यात आले होते. यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. पण यामधून दिवसाकाठी एक वकीलही या मार्गाचा उपयोग करत नसल्यामुळे हा भुयारी मार्ग कुचकामी ठरला आहे. चोरट्यांनी या भुयारी मार्गातील ट्युबलाईट्स चोऊन नेल्या आहेत. बाजुला असलेल्या लोखंडी झालरही चोरट्यांनी लांबविल्या आहेत. या भुयारात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. स्टार, तंबाखू तसेच सिगारेट यांची पाकिटे पडली आहेत. एकूणच या भुयारी मार्गाचा दुऊपयोग होत होता. त्यामुळे आता हा भुयारी मार्ग पूर्णपणे बंदच आहे.