ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांना तळय़ाचे स्वरूप : वाहनधारकांना अपघाताचा धोका : रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला स्मार्टसिटीचा दर्जा देण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्च करून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण उद्यमबागमधील समस्यांचे निवारण करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. येथील रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि पावसाच्या पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा कशी करायची, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शहराची स्मार्टसिटीकरिता निवड झाल्याने शहरातील काही भागातील रस्त्याचा विकास स्मार्टसिटी अंतर्गत करण्यात येत आहे. पण शहरवासियांना रोजगाराचे साधन आणि मनपाला महसूल मिळवून देणाऱया औद्योगिक वसाहतीच्या विकासाचा समावेश स्मार्टसिटी योजनेमध्ये करण्यात आला नाही. यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. औद्यागिक वसाहतीमधील समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासन आणि स्मार्टसिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर खड्डे निर्माण होवून तळय़ाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समस्या असलेल्या परिसरात विकासकामे राबवून स्मार्ट औद्योगिक वसाहत बनविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. पण समस्यांचे प्रमाण कमी असलेल्या परिसरात विकासकामे राबवून स्मार्टसिटी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविला आहे. या प्रकारामुळे उद्यमबाग वसाहतीकडे दुर्लक्ष झाले आहे.
वास्तविक पाहता औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडवून विकासकामे राबविण्याची जबाबदारी लघु उद्योग खाते आणि जिल्हा प्रशासनाची आहे. पण प्रशासनाने औद्योगिक वसाहतीला दुय्यम स्थान दिले असल्याने विकासापासून वंचित
आहे.
परिणामी उद्यमबाग वसाहतीमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची तळी साचली आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत असून औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांना तळय़ाचे स्वरूप आले आहे. परिसरामधून सुमेद कॉलनी, ज्ञान प्रबोधन शाळा व रहिवासी वसाहतींना जाणाऱया रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने दुचाकी वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यावरून विद्यार्थ्यांना ने-आण करताना वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच परिसरातील उद्योजक, कर्मचाऱयांना खड्डय़ांमधून ये-जा करताना रस्ता शोधावा लागत आहे.
सर्वच रस्ते खड्डेमय बनले असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत. खड्डे चुकविण्यास जावून अपघात घडत आहेत. पावसाचे पाणी साचल्याने खड्डय़ांच्या खोलीची कल्पना वाहनधारकांना येत नाही. परिणामी अपघात घडत आहेत. रस्त्याच्या विकासाकडे महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. अशातच वसाहतीमधील या खड्डय़ांमधून मार्ग काढताना दिसतात. येथील रस्त्याच्या आणि विविध विकासकामे राबविण्याकरिता मनपाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात विकासकामे कधी हाती घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण आणि तातडीने दुरुस्तीचे काम करण्याची मागणी होत आहे.