संभाजीनगर, वडगाव परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य
प्रतिनिधी /बेळगाव
उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्याच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच आता पावसाचा जोर वाढल्याने संभाजीनगर, वडगाव परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेश कॉलनी ते गोल्लर कंपाऊंडपर्यंतचा रस्ता चिखलमय बनल्याने नागरिकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोटय़वधीच्या निधीचा चुराडा करण्यात आला. या अंतर्गत काही वसाहतींमधील रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र बहुतांश रस्त्यांच्या विकासाकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसात रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. विशेषतः उपनगरातील रस्त्यांची अवस्था शेतीवाडीतील रस्त्यांप्रमाणे झाली आहे. गणेश कॉलनी ते गोल्लर कंपाऊंड, संभाजीनगरपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्यात आला नाही. सध्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली असून दुचाकी, चारचाकी वाहने घसरत आहेत. रस्ता खूपच खराब झाल्याने पादचाऱयांना देखील ये-जा करणे कठीण बनले आहे. तर संबंधितांनी येथील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.