सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जिल्हा न्यायव्यवस्था हा सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचा पहिला टप्पा असून उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच देशाच्या न्यायव्यवस्थेच्या कारभारातही जिल्हा न्यायालयांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे सरन्यायाधीशांनी रविवारी येथे नमूद केले. देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयीन व्यवस्थेत जिल्हा न्यायपालिकेची महत्त्वाची भूमिका विषद केली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना सरन्यायाधीशांनी जिल्हा न्यायपालिका आणि उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांच्यात समानतेची भावना असायला हवी, यावर भाष्य केले.
काही गुन्हय़ांमध्ये जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळेच उच्च न्यायालयांमध्ये जामीन याचिकांचा ओघ वाढत असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. सशक्त जिल्हा न्यायपालिकेच्या गरजेकडे लक्ष वेधताना चंद्रचूड यांनी जिल्हा न्यायपालिकेकडे आपण ज्याप्रकारे पाहतो त्याचा नागरिक म्हणून आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर खोलवर परिणाम होतो. जर जिल्हा न्यायाधीशांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसेल, तर त्यांच्या स्वतःच्या आदरात श्रेणीबद्ध पद्धतीत, एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात जिल्हा न्यायाधीशांनी जामीन देण्याची अपेक्षा आपण कशी करू शकतो, असेही ते पुढे म्हणाले.
भीतीची भावना काढून न्याय द्या!
जिल्हा न्यायालये कोणत्याही प्रकरणात जामीन देण्यास अनास्था व्यक्त करत असल्याने उच्च न्यायालयांमध्ये जामीन अर्ज सर्वाधिक येत आहेत. न्यायाधीश जामीन देण्यास इच्छुक नसतात याचा अर्थ त्यांच्याकडे क्षमता नाही असे नाही. तसेच जिल्हा न्यायाधीशांना गुन्हा समजत नाही म्हणूनही नाही. तर, त्यांच्या मनात एकप्रकारची भीतीची भावना निर्माण झालेली असते. जर मी जामीन दिला, तर मला एका गंभीर खटल्यात जामीन दिल्याच्या कारणावरून उद्या कोणी मला टार्गेट करेल का? अशी धास्ती त्यांच्या मनात असते. या भीतीच्या भावनेबद्दल कोणीही बोलत नाही, परंतु, त्याचा सामना आपण केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण तसे करत नाही, तोपर्यंत जिल्हा न्यायालये दंतहीन होतील आणि आपली उच्च न्यायालये अकार्यक्षम होतील, असे ते पुढे म्हणाले.
जिल्हा न्यायालये ही गौण न्यायव्यवस्था नाही!
आपल्या जिल्हा न्यायव्यवस्थेच्या सेवा परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आत्मविश्वासाची भावना आणली पाहिजे. देशातील जिल्हा न्यायव्यवस्था ही गौण न्यायव्यवस्था नाही. सर्वोच्च न्यायालय मोठे निवाडे देत असले तरी जिल्हा न्यायव्यवस्था छोटय़ा प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांची शांतता, आनंद, आणि विश्वास यांची व्याख्या करतात. त्यामुळे जिल्हा न्यायालयांची भूमिका गौण मानता येणार नाही असे सांगतानाच न्यायिक पायाभूत सुविधा सुधारण्याची गरज असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारा, पण त्यांच्यावर विश्वासही ठेवा!
सर्वोच्च न्यायालयात निवाडा देताना अनेक गोष्टींकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहतो. लक्षात ठेवा की कायदेशीर किंवा सामाजिक समस्येच्या नेहमी दोन बाजू असतात. सत्तेत असलेल्या लोकांना प्रश्न करा, पण त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. ते बरीच चांगली कामे करत असल्याने आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.