प्रतिनिधी / पणजी
पर्यावरण हे रोटरी इंटरनॅशनलचे मुख्य क्षेत्र असून शाश्वत विकास उद्दीष्टांपैकी एक आहे. जलसंधारण आणि भूजल व्यवस्थापन हे महत्त्वाचे आहे. तलाव आणि इतर पाणवठे दुर्लक्षित असून त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा पारंपारीक तलावांचे पुनर्संचयित करून भूजल पुनर्भरण करण्याची नितांत गरज आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढून शेतजमिनी लागवडीयोग्य होतील. या प्रकल्पाने गावातील पाणलोट क्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी पारंपारिक आणि पर्यावरणपूरक पद्धतींना चालना देण्याच्या उद्देशाने शारीरिक श्रम वापरले आहेत आणि कामाची गरज असलेल्या लोकांना आर्थिक लाभ देण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
रोटरी क्लब ऑफ मिरामारने एनजीओ -कॅच20च्या संयुक्त विद्यमाने नागोवा, कळंगुट येथील जलस्रोत पुनर्संचयित करण्यासाठी स्थानिकांच्या सक्रिय सहभागाने आणि कळंगुट आणि साळगाव ग्रामपंचायत क्षेत्र, तज्ञ आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्या सहकार्याने सुरुवात केली आहे. नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन प्रकल्प समितीचे अध्यक्ष आरटीएन सिद्धार्थ देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रकल्पाला साळगावच्या डॉ. मालिनी विद्याधर नाईक यांनी निधी दिला आहे. यावेळी गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदिप सरमोकदम यांच्या हस्ते “मंथन’’ या क्लबच्या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कळंगुट ग्रामपंचायतीचे सरपंच शॉन मार्टिन्स, एजी आरटीएन राजा मेलवाणी आणि साळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दयानंद मांदेकर. हर्षदा केरकर आणि ए.आर. कॅच20चे हायसिंथ पिंटो आणि मंथन रोटरीयनच्या संपादक सोनिया भोंसले, माजी अध्यक्ष रोटरेयिन शांतेंदू मोहिते आणि ऍन मेहर इबू हारून हे देखील यावेळी उपस्थित होते.
हा प्रकल्प भारत सरकारच्या जलशक्ती अभियान आणि गोवा सरकारच्या श्रमशक्ती से जल समृद्धीला पाठिंबा देणारा असून इतर समविचारी संस्थांना इतर गावांमध्ये अशा प्रकारच्या प्रकल्पांना प्रोत्साहन करेल असे रोटरी क्लब ऑफ मिरामारच्या अध्यक्ष आरटीएन स्नेहलता पेडणेकर यांनी सांगितले.
तलावातील गाळ काढणे आणि तलावातील कचरा साफ करणे, प्लास्टिक, काच इत्यादी काढून टाकणे याबरोबरच सर्व पाणवठय़ाभोवती फळझाडे आणि सावली देणारी झाडे लावणे ही कामे केली जातात. समुदायाने आता रस घेण्यास सुरुवात केली आहे आणि तलावांना भेट देणाऱया लोकांची (मुले आणि प्रौढ) संख्या हळूहळू वाढत आहे. गुरे पाणी पिण्यासाठी तलावात जातात. पक्षी आणि कीटक तेथे साठलेल्या पाणवठय़ांवर येऊ लागले आहेत त्यामुळे या भागाच्या जैवविविधतेत मोलाची भर पडली आहे.