छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी :
देशाला अध्यक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने नेले जात असून, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांवर कारवाई केली जात आहे. बीजेपी ही आता संपूर्णपणे भ्रष्ट जन पार्टी बनली आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सोडले. निवडणुका जवळ आल्या, की देशात जातीय तेढ निर्माण केली जाते, अशी तोफही त्यांनी भाजपावर डागली.
महाविकास आघाडीच्या वतीने येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित वज्रमूठ सभेत ते बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरेआदी उपस्थित होते. या सभेला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात यात्रा जरूर काढा. पण आक्रोश कसला?सध्या हिंदू जन आक्रोश यात्राही सुरू झाल्या आहेत. जगातील सर्वात शक्तिमान हिंदूंचा नेता पंतप्रधान झाला असतानाही हिन्दू बांधवांना आक्रोश करावा लागतो, हेच मुळात दुर्दैवी आहे. मी काँग्रेस सोबत गेल्याने हिंदुत्व सुटते. मग मुफ्ती मोहम्मद यांच्या सोबत हे जातात, तेव्हा त्याचे काय? मी हिंदुत्व सोडल्याचे एकतरी उदाहरण दाखवा. मोदी म्हणतात माझी प्रतिमा मलिन करण्याचे काम होत आहे. कोण हे आम्ही करतो का? मोदी सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकले जाते, त्रास दिला जातो. मात्र, यांच्या पक्षात वॉशिंग पावडरने धुऊन पवित्र करून घेतले जाते. खरेतर आता ही भ्रष्ट जन पार्टी बनली आहे. देश आज अध्यक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने नेला जात आहे. विरोधी पक्ष संपविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. तुमची ताकद दाखवायची, तर तिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखवा. सावरकरांची यात्रा काढताय, तर त्यांच्या अखंड भारताच्या स्वप्नाचे काय, असा सवालही त्यांनी केला.
अजित पवार म्हणाले, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले, ते चुकीचे आहे. हा पॅटर्न सर्वत्र वापरला, तर देशात स्थिरता निर्माण होणार नाही. निवडणूक आयोग पक्षपाती निर्णय देऊ लागला, तर त्यातूनही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच अपेक्षा आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुक्ती संग्राम सभेला केवळ 13 मिनिटे वेळ दिली, हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरुषांबद्दल तत्कालीन राज्यपालांनी अवमानकारक उद्गार काढूनही हे सरकार गप्प राहिले नि आता गौरव यात्रा काढत आहे. न्यायालयानेच नपुंसक सरकार म्हणून त्यांच्याविषयी टिप्पणी केली आहे. आता जनाची नाही किमान मनाची तरी बाळगा, असा टोलाही त्यांनी लगावला.
अधिक वाचा : मोदींची डिग्री नव्या संसदेच्या प्रवेशद्वारावर लावायला हवी