प्रवेश अर्ज वितरणाला प्रारंभ : कॉलेज परिसरात विद्यार्थी-पालकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीचा निकाल जाहीर होताच आता 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. नामांकित कॉलेजमध्येच प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे. शुक्रवारपासून कॉलेजमधून प्रवेश अर्ज वितरीत केला जात आहे. कॉलेजमध्ये चौकशी व प्रवेश अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
गुरुवार दि. 19 रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. निकालानंतर आपल्याला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यामध्ये चौकशीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालक दाखल झाले. पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रवेश अर्जाची रक्कम स्वीकारून विद्यार्थ्यांना अर्ज दिला जात होता. 9 जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. 15 जूनपर्यंत दंडात्मक शुल्काशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. 9 जून ते 30 सप्टेंबर या दरम्यान पहिले सेमिस्टर तर 13 ऑक्टोबर ते 31 मार्च या दरम्यान दुसरे सेमिस्टर घेतले जाणार आहे.
सायन्स, कॉमर्स शाखेकडे कल
विद्यार्थ्यांना दहावीमध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे सायन्स व कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. प्रवेश अर्ज घेताना पालकांकडून शैक्षणिक वर्षाची फी, इतर साहित्य याविषयी चौकशी केली जात आहे. ऑर्ट्स शाखेकडे तितकेसे विद्यार्थी इच्छुक नाहीत. याचबरोबर डिप्लोमा, आयटीआय या तांत्रिक अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा ओढा दिसत आहे. एकंदरीत प्रवेश अर्जासाठी गर्दी दिसून आली.
गुणवत्ता वाढल्याने विद्यार्थ्यांचा लागणार कस
यावर्षी दहावीच्या निकालात वाढ झाली आहे. सर्रास विद्यार्थ्यांनी 80 टक्क्मयांहून अधिक गुण घेतल्याने पुढील प्रवेश घेताना जोरदार स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल सायन्सकडे असल्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी व पालकांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.