400 व्या ‘प्रकाशपर्व’ समारंभात पंतप्रधान मोदींचे उद्गार, शबदकीर्तनासाठीही उपस्थिती
भव्य कार्यक्रम…
- 400 व्या प्रकाशपर्व कार्यकमासाठी लाल किल्ल्यावर विद्युत रोषणाई
- विषेश प्रकाशयोजना, शबदकीर्तन आदी कार्यक्रमांचे भव्य आयोजन
- गुरु तेजबहादूरसिंगांनी हिंदू धर्म, मानवता, मूल्यांसाठी केले बलिदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शीखांचे नववे गुरु तेजबहादूरसिंग यांचे कार्य आणि त्यांनी केलेला महान त्यात आजही सर्व भारतीयांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्यानेच आपली प्रगती होणार आहे, असे भावोत्कट उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील लाल किल्ला परिसरात केलेल्या भाषणात काढले.
तेजबहादूरसिंग यांचा 400 वा जन्मदिन गुरुवारी भव्य कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यासाठी विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच प्रकाश पर्वाचा परिणाम साधण्यासाठी विशेष प्रकाशयोजनाही करण्यात आली होती. त्यामुळे लाल किल्ला गुरुवारी संध्याकाळपासूनच विद्युत रोषणाईने झगमगताना दिसत होता.
भव्य कार्यक्रम
या 400 व्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आणि शबदकीर्तनात पंतप्रधान मोदी समाविष्ट झाले. त्यांनी तेजबहादूरसिंग यांना मानवंदना दिली. तसेच उपस्थितांना आणि देशाला उद्देशून संदेशही दिला. संस्कृती आणि मानवता यासाठी गुरु तेजबहादूरसिंग यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांनी मानवतेच्या संरक्षणासाठी संघर्ष केला. पण शांततेसाठीही ते प्रयत्नशील राहिले. त्यांचे बलिदान सर्व भारतीयांच्या दृष्टीने अविस्मरणीय राहिले आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी गुरु तेजबहादूरसिंगांच्या त्यागाचा गौरव केला.
मानवी मूल्यांच्या संरक्षणासाठी बलिदान
भारताने कधीही अन्य देशांवर आक्रमण केले नाही. शांतता आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत नेहमी कटिबद्ध राहिला आहे. आजचा भारत विश्वसमुदायाच्यासह शांतता आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील राहिला आहे. भारताने नेहमी आपली वेगळी ओळख जगाला दाखवून दिली आहे. गुरु तेजबहादूरसिंग यांच्या प्रेरणेने आपण प्रगती आणि शांततेच्या मार्गावर अग्रेसर आहोत. आज भारत जगासमोर ताठ मानेने उभा असून आपले आदर्श आणि मानवी मूल्ये यांच्यासाठी कोणतीही तडजोड न करता ठामपणे कार्यरत आहे. यामागे गुरु तेजबहादूरसिंगांची प्रेरणा आहे. भारत एकात्मता आणि सार्वभौमत्व यांच्या संरक्षणासंबंधात कोणाशीही तडजोड करणार नाही, असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी केली.
अमित शहा यांची मानवंदना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गुरु तेजबहादूरसिंग यांना प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मानवंदना दिली. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी गुरु तेजबहादूरसिंग यांनी आपले बलिदान दिले. अमित शहाही गुरुवारच्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात सहभागी झाले होते. अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
गुरु तेजबहादूरसिंग हे कोण ?
गुरु तेजबहादूरसिंग हे शीखांचे नववे सर्वोच्च धर्मगुरु होते. मानवी मूल्ये आणि आदर्शांचे संरक्षण करताना त्यांनी तत्कालीन मोगल सम्राट औरंगजेब याच्याशी संघर्ष केला होता. औरंगजेबाने त्यांना फासावर लटकविण्याचा आदेश काढला होता. इसवी सन 24 नोव्हेंतर 1675 या दिवशी त्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फाशी देण्यात आले. त्यांचा जन्मदिन प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जन्माला 400 वर्षे होण्याच्या निमित्ताने यंदा तो मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जात आहे. गुरु तेजबहादूरसिंग यांनी काश्मीरी पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन केले होते. दिल्लीतील सीस गंज साहिब आणि रकाब गंज हे गुरुद्वारा त्यांच्या बलिदानाशी जोडले गेले असल्याने भारतीयांसाठी महत्वाचे आहेत.