वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातात झाली होती घराची मोडतोड.पुन्हा घराला हादरा.ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर विरजण.रस्ता रूंदीकरण कामाच्या मागणीला जोर.
डिचोली/प्रतिनिधी
गेल्या सुमारे वर्षभरापूर्वी विठ्ठलापूर साखळी येथील उतरणीवर एक अवजड ट्रक रात्रीच्या वेळी सुनील नाईक यांच्या घरावर जोरदारपणे धडकल्याने सर्वांचाच थरकाप उडाला होता. आणि घराची बरीच मोडतोड झादी होती. नेमका तोच प्रसंग ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर या घरावर ओढावला आहे. काल सोम. दि. 29 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीची तयारी सुरू असतानाच रात्री 8.30 वा. च्या सुमारास एक कंटेनर उतरणीवर ताबा सुटल्याने रस्त्यावर आडला झाला. आणि तो येऊन नाईक यांच्या घराला धडकला. या धडकेत घखराची जरी मोठी मोडतोड झाली नसली तरी घराच्या भिंतीला तडा गेली आहे.
काल सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास सदर घटना घडली. साखळीच्या दिशेने जाणारा एमपी 09 एचजे 7655 हा कंटेनर विठ्ठलापूर येथे उतरणीवर गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर कोसळला. रस्त्यावर तो घसरत थेट नाईक यांच्या घरावर येऊन धडकला. या धडकेमुळे घराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतींना भेगा पडल्या, तर घराला हादरा बसला. घरात गणेश चतुर्थीची तयारी सुरू असतानाच हा प्रसंग ओढावल्याने घरातील मंडळीच्या उत्साहाला नाराजगीची किनार लागली.
गेल्या वर्षभरापूर्वी या घरावर धडकलेला ट्रक हा उतरणीवर थेट येऊन घरात घुसला होता. त्यामुळे या घराच्या मागच्या बाजूच्या बऱयाच भागाची नासधूस झाली होती. यावेळी सदर कंटेनर ट्रक रस्त्यावर कोसळून नंतर घराला धडकल्याने घराची मोठी मोडतोड झाली नाही. सुदैवाने या मोठय़ा हानीतून घर बचावले.
घटनेची माहिती मिळताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घरातील मंडळीची विचारपूस केली. या रस्त्यावर अशा घडणाऱया या घटना धोकादायक असून या रस्त्याच्या रूंदिकरणाचा प्रस्ताव सरकारदरबारी आहे. त्याची तयारी करण्यात आली होती. सध्या सदर कामाची स्थिती काय आहे ते पाहून हे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
या अपघातामुळे या रस्त्याच्या रूंदिकरणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. कारापूर तिस्क ते विठ्ठल मंदिरापर्यंत हा संपूर्ण रस्ता रूंद करून सदर उतरणीवर असलेले धोकादायक वळण कापण्यात येणार आहे. व रस्ता सरळ करण्यात येणार आहे. असे सदर कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी वळणावर असलेल्या फातर्फेकर यांच्या घराचा बराच भाग जातो. त्यांना त्याचठिकाणी नवीन घर उभारून देण्याचा सदर कामाचा प्रस्ताव आहे. या कामाला सरकारने विनाविलंब हात घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.