रस्त्यावर जागोजागी खड्डे, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील सन्नहोसूर ते तोपिनकट्टी हा तीन कि. मी. चा रस्ता ग्राम सडक योजनेतून एक वर्षापूर्वी करण्यात आला होता. अवघ्या एक वर्षातच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता या पावसात पूर्णपणे खराब होऊन वाहतुकीस त्रासदायक ठरत आहे.
सन्नहोसूर ते तोपिनकट्टी हा रस्ता जिल्हा पंचायतीच्या ग्राम सडक योजनेतून मागीलवर्षी करण्यात आला होता. यासाठी 60 लाखाचा निधी मंजूर झाला होता. खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने जागोजागी रस्त्यात मोठेमोठे खड्डे पडले असून रस्ता करण्यासाठी वापरण्यात आलेली खडी वर आल्याने त्यामधून वाहन चालविणे म्हणजे एकप्रकारची कसरत करावी लागत आहे. पावसाळय़ात हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. परिणामी सरकारचा निधी वाया जाणार आहे. याबाबत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना, हा रस्ता मागीलवर्षी केला होता. त्यावेळी आम्ही रस्ता करताना दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र कंत्राटदाराने काहीही न ऐकता रस्ता आपल्या मर्जीनुसार केला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असून कंत्राटदाराने ताबडतोब नादुरुस्त झालेला रस्ता दुरुस्त करून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.