टेसुल बन फुले रंग छाये
भँवर रस लेत फिरत मदभरे
अरे रसलोभिया हमें ना तरसावो
पिया जो परदेसा जरत मन मेरो
पंडित कुमार गंधर्वांचं गाणं म्हणजे अक्षरशः ‘गंधरव’ म्हणावं लागेल असं. सुगंधाला स्वर असावा तशीच अनुभूती ही! असंख्य बंदिशी, चिजा त्यांनी रचल्या. वाग्गेयकार, नायक असणं ही सर्वच गायक कलाकारांच्या बाबतीत असणारी गोष्ट नाहीच. स्वरांसोबतच शब्दांचं इतकं सूक्ष्म ज्ञान असणं ही अपूर्वाई आहे. मध्यप्रदेश अर्थात मालव प्रांतात विपुल प्रमाणात आढळणाऱया पलाशपुष्पांचं हे वर्णन बागेश्री रागात बांधलं आहे. त्रिशूल भासणारी ही फुलं, त्यांचे ते लक्षवेधी रंग, त्यावर गुंजारव करणारे भुंगे आणि त्यांना विनंती करणारी ती विरहिणी! एखाद्या चित्रात शोभेल असा हा ‘मजकूर’. हो. चिजेलाही मजकूर असतो. पं. कुमारजींना चित्रकला, शिल्पकला या विषयाचंही किती बारीक ज्ञान होतं याचा प्रत्यय यातून येतो. त्यांनी ही भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम म्हणून फूल वापरलं. खरं तर ‘फुलं’ हा विषय जर बाजूला केला तर कविता आणि गाण्याच्या क्षेत्रातलं सौंदर्य अदृश्यच होईल की काय अशी भीती वाटते. सहज म्हणून विचार केला तर फूलन के हरवा, नयो कलियन पर गूँजत भँवरा, केतकी गुलाब जूही, डार डार पात, अतर सुगंध अशा कितीतरी चिजा कानाशी आणि मनाशी झुळझुळ वाहत येतात. वसंत किंवा बहार किंवा यांचा जोडराग हा तर ऋतुराज. त्यात तर फुलं, सुगंध, भुंगे याचीच लयलूट असते. फूल आणि कळी गाण्यातल्या कोणत्याच प्रकारात वर्ज्य नाही. बंदिशी ते सिनेगीतं या सर्व प्रकारात इतकी फुलं फुलली आहेत की अजून शेकडो वर्षे त्याचा सुगंध रसिकांना पुरेल. चीज कम सिनेगीत या प्रकारातलं ‘केतकी गुलाब जूही चंपक बन फूले’ हे पं. भीमसेन जोशी आणि मन्ना डे या दोन अतिशय महान गायकांनी गायलेलं गाणं ‘बसंत बहार’ या सिनेमाचं प्रमुख आकर्षण ठरलं होतं. आजही ते गाणं ऐकणं ही एक रोलर कोस्टर राईड आहे. अक्षरशः अंगावर येतं ते गाणं. या गीताचे शब्दही ‘शैलेंद्र’ नामक सिद्धहस्त गीतकारांच्या लेखणीतून उतरले आहेत. असे शब्द म्हणजेही गंगावतरणच होय! इतके मोहक आणि तितकेच समर्पक! तसंही प्रत्येक गाण्याचीही जणु काही कुंडलीच असते. ज्या त्या गाण्याचं भाग्य!
स्वामीकार रणजित देसाई यांच्या एका कथासंग्रहाचं नाव गंधाली असं आहे. त्यातील कथा या संगीत या विषयाला वाहिलेल्या आहेत. परंतु त्यांना नाव मात्र गंधाली हेच निवडावं वाटलं. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद बंदेअली खांसाहेब आणि राजगायिका चुन्नाबाई यांच्यातील नाजूक भावबंध त्यांनी सोनचाफ्याच्या फुलाच्या माध्यमातून साकारले आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य ते वाचताना डोळय़ांसमोर उभं राहतं. तसंच ‘उत्सव’ या सिनेमातील
मन क्मयू बहका रे बहका आधी रात को
बेला महका रे महका आधी रात को
त्या गाण्यात रेखा अधिक सुंदर, तिच्या चेहऱयावरचे भाव अधिक सुंदर की गाण्याचे शब्द, स्वर अधिक लक्षवेधी, असा प्रश्न पडतो. तर हीच रेखा अमिताभसोबत
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए
दूर तक निगाहों में है गुल खिले हुए
या गाण्यात जी काय म्हणून दिसलीये! लाजवाब! या गाण्यात टय़ूलिपची अतिसुंदर बाग तर आहेच, पण ‘गुल खिले हुए’ चा सगळा इफेक्ट या सगळय़ातून असा उतरून आलाय की ते एक स्वप्नच वाटते. तसंही पूर्वीच्या आणि आताच्याही बऱयाचशा सिनेमांतून फुलं आणि बागा आणि त्यांच्या साथीने रंगणारं, फुलणारं प्रेम हा एक मस्ट सीन असतो. पूर्वीच्या कर्मठ काळात नायक नायिकेच्या चुंबनाचं दृश्य दाखवतानाही दोन फुलं जवळ आलेली दाखवत असत. तर दुर्दैवी घटना दाखवतानाही हारातून गळलेलं फूल किंवा तुटलेली माळ दाखवली जात असे. ‘कश्मीर की कली’ सिनेमा तर फुलाच्या कळीसारख्या मुलीशीच सुरू होतो.
काश्मीर की कली हूँ मै
कश्मीर की कली हूँ मैं
मुझसे न रूठो बाबुजी
मुरझा गई तो फिर ना मिलूंगी
कभी नहीं कभी नहीं कभी नहीं
शम्मी सारखा भुंगा आणि शर्मिला टागोर नावाची कळी! आज सत्तरीत असलेल्या पिढीच्या तारुण्यकाळातली ही फिल्म आणि त्यातली असंख्य प्रत्यक्ष फुलं आणि मानवी फूल त्यांना उसासे सोडायला भाग पाडतं.
फूलों का तारों का सबका कहना है
एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हमें संग रहना है
म्हणत म्हणत खास स्टाइलने मान हलवणारे एव्हरग्रीन देवसाब एकदम आवडून जातात. तर ‘आनंद मरा नहीं. आनंद मरते नहीं’ म्हणणाऱया आनंदचं
दीये जलते हैं फूल खिलते है
बडी मुश्कील से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं
एकदम हलवून जातं. फुलाचं आयुष्य एका दिवसाचं! माणसाच्या आयुष्यातही असं घडू शकतं हे कडवं सत्य आणि खरा दोस्त मिळणं हे विरळा असणं हे दोन्ही आपल्याला यातली फुलं शिकवतात.
नाटय़संगीतालाही फुलांचं वावडं नाही. आद्य आणि सद्य असलेलं संगीत सौभद्र फुलांच्या गाण्यांनी सजलंय. ‘पुष्पपरागसुगंधित’ हे त्यातलं एक अतिसुंदर पण अतीव अनवट अवघड गाणं. ते म्हणायचा नुसता विचार करायलाही सिंहाचं काळीज हवं. काफी थाटातल्या अनेकविध रागांचं मिश्रण या गाण्यात आहे आणि हा कोलाज दाखवणं हे सोप्याचं नव्हेच. हे गाणाऱया सर्वच कलाकारांना साष्टांग नमस्कार! सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर यांनी ‘नक्षत्रांचे देणे’ मध्ये गायलेल्या ‘घाई नको बाई अशी’ या गाण्याचे शब्द आठवावे. या गाण्यात फुलांचं अक्षरशः संमेलन भरलंय. ‘धाडिला राम तिने का वनी’ या संगीत नाटकातलं हे गाणं मूळचं आशाबाईंचंच आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत त्या फुलांचं फूलपण हळूवारपणे बरसवतं.
कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा विसरले न मी तुला
पिउन चांदणे सरात चांदरात ओसरता
खुणावीत मधुनलिनी बोलविती हळुच मला
एकेका ओळीवरून जीव ओवाळून टाकावा! किंवा त्रैलौक्मयमोलाची फुलंच ओवाळून काढावीत. कविवर्य राजा बढे यांना फुलाचं मन इतकं समजलं होतं की
‘ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले’ असं म्हणत ते ताऱयांनाही फुलं करून टाकतात. गदिमांनी लिहिलेल्या गीतातली फुलं तर मोजूच नये. संपणारच नाहीत. पण वानगीदाखल
सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास निळय़ा कमळांना येतो
एवढं एकच गीतरामायणातलं उदाहरण पुरे. तसंच जुन्या कविता म्हणून आजही ताजी असलेली
‘टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ संगीत आणि फुलं यांचं नातं इतकं जुनं आहे की अगदी रामरक्षा किंवा अथर्वशीर्षही याला अपवाद नाहीच.
ध्यात्वा नीलोत्पलशामं रामं राजीवलोचनम्।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ
सारख्या ओळी काय वेगळं दर्शवतात? अथर्वशीर्षातही बाप्पाचा उल्लेख ‘रक्तपुष्पैसुपूजितं’ असा केलाय.
भावसंगीत आणि चित्रसंगीत यात ‘गंध फुलांचा गेला सांगून’ पासून ते
गगना गंध आला मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी जळत्या ज्वाला
पासून ‘दूरच्या रानातल्या बकुळीच्या तळी’, ‘फुलले रे क्षण माझे फुलले रे’, खुलता कळी खुलेना, बाजार फुलांचा भरला, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, त्या फुलांच्या गंधकोषी, वेगवेगळी फुले उमलली अशी यादी जर सुरू केली तर संपणारच नाही. फुलांना बहरणं, उमलणं आणि कोमेजून गळून पडणं एवढंच माहित असतं. प्रत्येक फुलाचा सुगंध निराळा, प्रत्येकाचं रंगरूप वेगळं! म्हणून तर बोरकर म्हणतात.
पूजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांगसोहळा
धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा
फुलाच्या आयुष्याचं हे सार्थक आपल्याला किती आणि काय सांगतं नाही?
-ऍड. अपर्णा परांजपे प्रभु