प्रवेशद्वारावर ओवाळणी करून स्वागत, उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील सर्व शाळा पूर्वनियोजित तारखेनुसार म्हणजे काल सोमवारपासून सुरू झाल्या असून मुलांच्या किलबिलाटाने त्या गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. सुमारे दोन वर्षानंतर मुलांची शाळेतील मित्र-मैत्रिणी, शिक्षकांशी गाठभेट झाली आणि सर्वांना आनंद झाल्याचे दिसून आले. एकंदरीत शाळा उत्साहात चालू झाल्याचे चित्र असून उत्साहाचे वातावरण आहे. बहुतेक शाळांमधून विद्यार्थ्यांचे ओवाळणी, पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पालकांनी देखील पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडण्यासाठी व परत नेण्यासाठी गर्दी केली होती.
कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात आल्या असून मास्क, सॅनिटायझरचा वापर अनेक शाळांमधून झाल्याचे समोर आले तथापि मुलांच्या, पालकांच्या गर्दीमुळे सामाजिक अंतराचे पालन होणे शक्य नसल्याचे दिसून आले.
कोरोनाची बाधा वाढल्यामुळे गेली दोन वर्षे शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या आणि शिकवणी ऑनलाईन पद्धतीने चालू होती. आता प्रत्यक्ष हजेरीत नियमितपणे शाळा सुरू करण्यात आल्या असून त्या कायम चालू रहातील, अशी अपेक्षा पालक शिक्षक वर्ग बाळगून आहे.
पावसाळी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
दरम्यान पावसाळी साहित्य, वहय़ा पुस्तके खरेदी करण्यासाठी मुले, पालकांची बाजारात दुकानात गर्दी दिसत असून त्यांचे दर वाढल्यामुळे खर्च भरमसाठ झाल्याची भावना पालकवर्गामध्ये आहे.