शिक्षक, शाळा प्रशासन, पालकांना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
रेसकोर्स परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील शाळांना मागील आठवडा सुटी देण्यात आली होती. बिबटय़ा अद्याप वन विभागाला चकवा देत असल्याने अखेर शिक्षण विभागाने मंगळवार दि. 16 पासून शाळा सुरू केल्या. शिक्षक, शाळा प्रशासन व पालकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे सांगून शाळा सुरू करण्यात आल्या. आठवडाभरानंतर शाळा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजल्याचे चित्र पहायला मिळाले.
शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी जाधवनगर परिसरात बिबटय़ा दाखल झाला. रविवार दि. 7 रोजी रेसकोर्स परिसरात बिबटय़ाचे दर्शन काही नागरिकांना झाले. वन विभागाने सापळे, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे याद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबटय़ा काही केल्या वनविभागाच्या जाळय़ात सापडलेला नाही. सोमवार दि. 8 पासून बेळगाव शहरासह विजयनगर व हिंडलगा येथील 22 शाळांना सुट्टय़ा देण्यात आल्या होत्या. प्रत्येक दिवशी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडून सुटीमध्ये वाढ करण्यात येत होती.
खबरदारी घेण्याच्या सूचना
बिबटय़ाचा शोध अद्याप न लागल्याने अजून किती दिवस शाळा बंद ठेवणार असा प्रश्न निर्माण होत होता. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात घेऊन मंगळवार दि. 16 पासून शाळा पूर्ववत सुरू झाल्या. शहर शिक्षणाधिकाऱयांनी सोमवारी सायंकाळी एक पत्रक जाहीर करून शाळा व्यवस्थापन व पालकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणताही विद्यार्थी शाळेबाहेर एकटा फिरणार नाही, वर्ग खोल्यांचे दरवाजे व खिडक्मया सुरक्षित राहतील याबरोबर कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेमध्ये हजर राहण्याची सक्ती करू नये अशा सूचना त्यांनी पत्रकाद्वारे केल्या होत्या.
आठवडाभरानंतर रेसकोर्स परिसरातील शाळा मंगळवारी सुरू झाल्या. सकाळच्या सत्रात पालक, रिक्षावाले विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळांच्या बाहेर उपस्थित होते. विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचले की नाही याची तपासणी ते करीत होते. शाळा सुटल्यानंतरही पालक, रिक्षावाले आल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर सोडले जात होते.