माणूस हा एक जिज्ञासू जीव आहे आणि त्याच्या या जिज्ञासू स्वभावामुळे, तो स्वतःचे आणि समाजाचे आयुष्य आजपर्यंत विकसित करतो आहे. छोटय़ा छोटय़ा शोधांनी खरोखरच आपल्या जगण्याचा मार्ग बदलला आहे. मग तो चाकाचा शोध असो, शेती असो किंवा तंत्रज्ञान असो, माणसाने स्वतःच्या जोरावर संपूर्ण ब्रह्मांडासमोर बुद्धिमत्तेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. पूर्वी कठीण किंवा अशक्मय वाटणाऱया गोष्टी आज इतक्मया सहजपणे आपण पार पडतो की बऱयाच वेळेला ती गोष्ट घडवून आणण्यामागचे कष्ट आणि वेळ आपण विसरून जातो. कदाचित यामुळेच माणसाला जगातला सर्वात हुशार प्राणी म्हटले गेले आहे.
जेव्हा या ग्रहावर मनुष्याचा पहिला जन्म झाला, तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हते. त्यावेळी त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणे. परंतु आज, त्याच्याकडे सुरक्षित जीवनासाठी केवळ संसाधनेच नाहीत, तर तेच जीवन ऐषोआरामात जगण्याची अनेक साधनेदेखील आहेत. पण किती लोकांना हे माहीत आहे की, माणसाला दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या बहुतेक गोष्टींचा शोध खरोखरच भारतात लागला होता? भारताने जगाला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. परंतु हे असे काही शोध आहेत जे बऱयाचदा दुर्लक्षित राहतात.
1. शॅम्पू-
शॅम्पूचा शोध इसवी सन 1500 मध्ये भारतात लागला. त्यावेळी भारतातील लोक आवळा, शिकेकाई या औषधी वनस्पती उकळून तयार केलेल्या पेस्टने आपल्या शरीराची आणि केसांची मालिश करत असत. संस्कृतमध्ये ‘फेनाका’ म्हटले जाणारे फळ शॅम्पूसाठी एक फेस तयार करण्यासाठी वापरले गेले. जे संयोजनाचा तो घटक बनले जे केवळ केसांना मालिशच करत नाही तर त्यांना मऊ, चमकदार बनवते. शॅम्पू हा शब्द हिंदी शब्द ‘चंपू’ (याचा अर्थ ‘मालिश’ असा होतो) पासून तयार झाला आहे. शॅम्पूची संकल्पना जगासमोर आणणारी व्यक्ती आहे डीन मोहम्मद. 1814 मध्ये या बंगाली उद्योजकाने इंग्लंडमध्ये शॅम्पूचे पहिले दुकान उघडले.
2. बटण-
बटणसारखी एक छोटीशी गोष्ट भारतात शोधली गेली हे कोणाला माहीत होते? आज विविध प्रकारची आणि किमतीची बटणे बाजारात सहज उपलब्ध आहेत. पण एकेकाळी हा शोध कपडय़ांच्या क्षेत्रात क्रांतिकारक मानला गेला होता. असे म्हणतात की बटण किंवा गुंडीचा शोध हा त्यावेळच्या भारत-पाकिस्तान भागात असलेल्या सिंधू संस्कृतीत झाला होता. इ.स.पूर्व 2000 मध्ये शिंपल्यापासून बनवलेल्या बटणचा वापर अलंकारिक उद्देशासाठी केला जायचा. काही बटणे भौमितिक आकारात कोरली गेली होती आणि त्यात छिदे होती जेणेकरून त्यांना धाग्याने कपडय़ांशी जोडले जाऊ शकत असे.
3. मोतीबिंदू शस्त्रक्रिया-
माणसाची दृष्टी हे देवाने त्याला दिलेले वरदान आहे. आपल्या दृष्टीला कोणतीही इजा किंवा आजार झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. परंतु वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे, आता अनेक गंभीर आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. सुश्रुत हे नाव अनेक भारतीयांना माहिती आहे. कारण सुश्रुताला भारतीय शस्त्रक्रिया आणि नेत्रविज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. सुश्रुत संहिता या हस्तलिखितात सुश्रुताने मोतीबिंदू काढायच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. टोकदार शस्त्राचा वापर करून, विविध कार्यपद्धतींद्वारे मोतीबिंदू काढण्याची क्रिया त्यांनी या पुस्तकातून लोकांसमोर मांडली आहे. एवढे असूनही हवी तेवढी मान्यता सुश्रुतला मिळाली नाही. कारण काही नेत्ररोगतज्ञ सुश्रुताच्या प्रक्रियेचे दावे नाकारतात आणि दावा करतात की मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रथम इ.स. 1700 मध्ये जॅकेस डेव्हियलने केली होती.
4. बुद्धिबळ-
बुद्धिबळाचा उगम हा भारतामध्ये झाला. पूर्वी प्रसिद्ध असलेला खेळ ‘चतुरंग’ ज्याचा अर्थ चार विभाग (पायदळ, घोडदळ, हत्ती आणि सारथी) असा आहे, तो बुद्धिबळाचाच एक प्रकार आहे. चतुरंग या खेळाची ओळख नंतर भारतीयांच्या माध्यमातून पर्शिया देशामध्ये झाली. तेथे या खेळाचे नाव ‘चतरंग’ असे पडले. रशिदुन खलिफाने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर या खेळाचे नवीन अरबी नाव पडले ‘शतरंज’. बुद्धिबळाचे नियम या काळात आणखी विकसित झाले. खेळाडू ‘शाह’ (राजासाठी फारसी शब्द) म्हणून संबोधू लागले. आणि तेथूनच ‘शाह मत’ या वाक्प्रचाराचा उगम झाला. ‘शाह मत’ चा अर्थ ‘राजा असहाय्य आहे’. त्यासारखेच इंग्रजीमधील ‘चेकमेट’ सगळय़ांनाच माहिती असेल.
5. यूएसबी (युनिव्हर्सल सिरीयल बस)
यूएसबी असे एक माध्यम आहे ज्यांनी आपण आपल्या संगणकातली आधारसामग्री दुसऱया यंत्रामध्ये सहजपणे हस्तांतरित करू शकतो. या छोटय़ा तंत्रज्ञानाच्या शोधामुळे आपले जीवन खरोखरच सोपे झाले आहे. ‘इंटेल’ नावाच्या जागतिक कंपनीत काम करणाऱया अजय भट्टने त्यांच्या संघासोबत 1995 साली युएसबीचा शोध लावला. जरी यूएसबी स्लॉट एक अतिशय लहान दिसणारे यंत्र असलेतरी त्यात 80 जीबी डेटा असू शकतो. हे वापरणे सोपे आहे. त्यावेळेला जेव्हा अजय भट्टने या यंत्राचा शोध लावला तेव्हा त्यांना फारसे पैसेदेखील मिळाले नव्हते. पण आज त्यांच्या या शोधामुळे सर्व भारतीयांना त्यांचा नक्कीच अभिमान वाटेल.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या आयुष्यात दुर्लक्ष करतो, पण त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कित्येक लोकांनी कित्येक वर्षे कष्ट घेतले आहेत. भारताकडे प्रतिभेचा एक निरंतर साठा आहे आणि हीच बुद्धिमत्ता आणि प्रतिभा आपण जपली पाहिजे. असे काहीतरी काम केले पाहिजे ज्यामुळे फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा उद्धार होईल. आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागाची आणि कष्टाची किंमत ठेवली पाहिजे आणि आपल्याला त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिभेचा वारसा पुढे कायम ठेवला पाहिजे! भारत देश झपाटय़ाने प्रगती करतोच आहे पण आपल्या माणसांची साथ आणि ज्ञान जर त्याला मिळाले तर आपल्याला आकाशाला गवसणी घालण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
-श्राव्या माधव कुलकर्णी