कटिहार जिल्हय़ातील जयनगर येथील महम्मद रफिक नामक खादाडाने एक पत्नी पुरेसा स्वयंपाक करू शकत नाही म्हणून दुसरे लग्न केले आहे. रफिक याचे खाणे दररोज तीन किलो तांदळाचा भात आणि चार किलो गव्हाच्या चपात्या शिवाय इतर पदार्थ असे आहे. इतका स्वयंपाक त्याची एक पत्नी करू शकत नाही. त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले आहे. त्याचे वजन 200 किलो असून अजिबात चालू शकत नाही. दहा पावले चालल्यानंतरही त्याला धाप लागते. त्यामुळे तो काही कामही करू शकत नाही. त्याची मोठी शेती असल्याने काम न करताही त्याला खाण्यापिण्याची ददात नाही. त्याला बुलिमिया नर्व्होसा नामक आजाराने ग्रासल्याचे त्याच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मराठीत याला भस्म्या रोग असे म्हणतात. त्याच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर हा आजार वाढून आता होत आहे तितकी हालचालही त्याच्याकडून होणार नाही, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. हा एक मानसिक आजार आहे, असेही काही संशोधकांचे मत आहे.
या आहारविकाराचे अनेक प्रकार आहेत. एनोरेक्झिया नर्व्होसा, ऑर्थोरेक्झिया नर्व्होसा आणि बिंजइटिंग डिसऑर्डर अशी त्यांची नावे आहेत. या आजारावर शस्त्रक्रिया हा उपाय असून अंगातील अतिरिक्त चरबी शस्त्रक्रियेने काढली जाते. तथापि, खाण्यावर नियंत्रण न ठेवल्यास शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा वजन वाढू शकते.