अखेर भारताने 2024 ट्वेंटी-20 विश्वकरंडकावर आपले नाव कोरले आहे. भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे करणारा भारताचा हा सांघिक आविष्कार आहे. 2011 मधील यशानंतर सततची हुलकावणी आणि अंतिम सामन्यात पत्करावी लागणारी हार या सर्वावर भारताने अखेर मात केली. सूर्यकुमार यादवने याच सामन्यात झेललेला अप्रतिम झेल म्हणजे भारताच्या हातात आलेला फक्त चेंडू नव्हता तर ट्वेंटी-20चा चषकच होता. लाखो भारतीयांना या प्रसंगाने 1983 च्या विश्वकपची आठवण झाली. फायनल सामान्यात त्यावर्षी विवियन रिचर्डचा कपिल देवने असाच झेल घेतला होता. भारताने विश्वचषक जिंकण्याची ती नांदी होती. अर्थात त्या वेळच्या भारतीय संघावर तरीही कोणाचा विश्वास बसत नव्हता. कारणही तसेच होते. भारताच्या कामगिरीबद्दल जग फारसे चांगले बोलत नव्हते. मात्र कपिल आणि त्याच्या संघाची जिद्द होती की दिग्गज वेस्ट इंडीजच्या हातून कप हिसकावून घेऊन त्यावर आपले पहिले वहिले नाव करायचे. क्रिकेट विश्व त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण, कपिलने घेतलेल्या त्या एकाच झेलाने सगळ्या जगताची धुंदी उतरवली…. या वेळच्या भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा अशी झुंज बराच काळ द्यावी लागली. एक तर गेल्या वर्षभरातील ही तिसरी आयसीसीची प्रमुख स्पर्धा होती. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना भारत विऊद्ध ऑस्ट्रेलिया झाला आणि ऑस्ट्रेलियाने भारताला मात केली. नोव्हेंबरमध्ये भारतातच झालेल्या एक दिवशीय विश्वचषक अंतिम सामन्यात सुद्धा भारत आणि
ऑस्ट्रेलिया समोरासमोर होते. अहमदाबादचा हा सामना आपण जिंकू असे संपूर्ण भारताला वाटत होते. मात्र यशाने येथे सुद्धा हुलकावणी दिली. ऑस्ट्रेलियासमोर दोन वेळा नांग्या टाकल्याने भारताची जगभर नाचक्की झाली. अशा स्थितीत आयसीसीची तिसरी टी-ट्वेंटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे भारताला आपले अपयश आणि अपमान धूवून काढण्याची संधी होती. अर्थातच भारताच्या वाटेत आडवा उभा होता तो
ऑस्ट्रेलिया. ही संधी भारताने चांगलीच साधली. रोहितच्या नेतृत्वाखाली आणि द
वॉल राहुल द्रविडच्या शांत, संयमी प्रशिक्षक नजरेखाली भारतीय संघाने चांगली सुऊवात केली. सुपर सिक्समध्येच भारत आणि
ऑस्ट्रेलिया सामना होणार होता. भारत आता पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून हरणार आणि बाहेर फेकला जाणार अशी आकडेवारीकडे बघून मांडणी करणाऱ्यांची भावना झालेली असावी. पण, भारताने त्यांना चकवले. दोन अजिंक्य स्पर्धेतील अपमानजनक पराभवाचा वचपा काढताना भारताने ऑस्ट्रेलियाला सुपर सिक्समध्येच बाद केले आणि भारताच्या विश्वविजेतेपदाची वाटचाल सुरू झाली. इथे आणखी एका इतिहासाला विचारात घेतले पाहिजे. राहुल द्रविड जो आपल्या काळातील एक विख्यात खेळाडू होता. तो द्रविड, सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर या खेळाडूंनी भारताला यशाची सवय लावली होती. मात्र दुर्दैवाने राहुलच्या कारकीर्दीत भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. ही खंत त्याच्या संपूर्ण आयुष्याला लागून राहिली होती. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षात तो प्रशिक्षक म्हणून पुन्हा मैदानावर उतरला आणि 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याने या मुलांना जी दिशा दिली त्यातून विश्वविजेतेपद भारताचे झाले. आता वेळ टी -20 ची होती. आणि त्याचा निकाल आता आपल्या समोर आहे! खेळाडू म्हणून राहुल द्रविडला असे यश मिळाले नसेल पण प्रशिक्षक म्हणून त्याने आपले ध्येय पूर्ण केले. एका अर्थाने त्याचा सहभाग असलेल्या संघाने विश्वचषकावर नाव कोरलेच! त्याच्या चाहत्यांसाठीही त्याने दिलेली आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरेल यात शंकाच नाही. इतिहास घडवणाऱ्या या घटनेने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवतानाच दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंची निवृत्ती आणि तिसरा दिग्गज द वॉल राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून निवृत्ती आनंदाच्या काळातही थोडी विचलित करणारी आहे. हे खरेच. पण, अर्थात भारतासारख्या क्रिकेट संघाला, ज्याच्याकडे रत्नांची खाण आहे, त्याला विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या निवृत्तीची घोषणाही शुभमन गील, के. एल. राहुल सारख्या उदयोन्मुख खेळाडूंच्या तळपण्यासाठीची संधी मानावी लागेल. हा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने हा तो आपला अखेरचा सामना होता असे सांगून टी-20 क्रिकेटला विराम दिला. त्याच्यानंतर काही वेळाने रोहित शर्माने देखील आपणही या खेळ प्रकारातून निवृत्त होत आहोत असे जाहीर केले. अर्थात दोघांची भारतातील आणि भारताबाहेर असलेली प्रसिद्धी आणि प्रतिमा लक्षात घेता त्यांनी आधीपासून मार्केटिंग करून सुद्धा हे सामने खेळले असते. मात्र असा कोणताही गाजावाजा न करता सभ्य क्रिकेटर प्रमाणे केवळ आपल्या खेळाकडे लक्ष देऊन योग्य वेळेला दोघांनी निवृत्ती जाहीर केली. अशावेळी सामन्यापूर्वीपासून त्यांना जे ग्लॅमर मिळाले असते त्याच्या मोहात न पडता हा सामना जिंकणे त्यांनी महत्त्वाचे मानले. आपल्या काळात एक विश्वचषक भारताला भेट देऊन त्यांनी निवृत्ती घेतली हे त्यांचे थोरपणच आहे. सर्वांना असे सहजपणे हे यश साजरे करता आले नसते. मात्र यशाच्या आणि लौकिकाच्या परमोच्च शिखरावर असताना त्यांनी केलेली ही कृती खरोखरच कौतुकास्पद आहे. जुन्यांची गर्दी हटल्याशिवाय नव्या रक्ताला वाव मिळत नाही. आता भारतीय क्रिकेट संघाला पुढचा काळ थोडा कठीण जाईल पण प्रशिक्षक, कर्णधार आणि सर्वोत्तम खेळाडू यांच्याशिवाय नवा संघ बहरेल यात शंकाच नाही. द्रविड सारख्या सौम्य, शांत प्रशिक्षकाऐवजी आता कदाचित भारताला गौतम गंभीर सारखा आक्रमक प्रशिक्षक मिळेल. काळानुसार होणारे हे बदल आहेत आणि आता आक्रमक भारताचे दर्शन घडायचे तर त्या गतीचेच आणि तसेच खेळाडू आणि प्रशिक्षकही मिळतील. शेवटी प्रेक्षक आणि खेळ बदलतोय तसा खेळाडूही बदललेलाच दिसणार.