बिहारची राजधानी पाटणा येथे एनआयटी संस्थेचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी नवी डिझाईनचा रासायनिक रिऍक्टर निर्माण केला असून त्यामुळे औषधे आणि खतांच्या निर्मितीचा वेग वाढणार आहे. या रिऍक्टरचा पेटंटही देण्यात आले आहे. औषध आणि खत निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. या प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ यापूर्वी लागत होता. वेळ अधिक लागल्याने खर्चही वाढत होता. तथापि या नव्या रिऍक्टरमुळे 24 तासात होणारे काम 15 ते 20 मिनिटात पूर्ण होऊ शकते. त्यामुळे औषधे आणि खते यांच्या निर्मितीचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढणार असून उत्पादन खर्चातही बचत होणार आहे. बिहार एनआयटीच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखांनी ही माहिती दिली.
या संस्थेचे विद्यार्थी शिबू नस्कर, सुशीतल माल, तुषार दास आणि परमानंद कुमार यांनी दीड वर्षे प्रयत्न करून हे शोधकार्य पूर्ण केले. त्यानंतर 1 वर्षात त्याला पेटंटही मिळाले. या शोधकार्यात हाजीपूरच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचेही सहकार्य लाभले आहे. या रिऍक्टरच्या साहाय्याने बिगर स्टेरॉईड औषधे ट्राय फ्लोरो मिथाईल गटातील औषधे इत्यादी तयार होणार आहेत. त्याचप्रमाणे द्रवरुप खते, जल शुद्धीकरण प्रक्रिया इत्यादी कामांमध्येही हा रिऍक्टर उपयोगी पडणार आहे.