राज्यपालांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ
वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांचे आणि त्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण आता तापू लागले आहे. महिलांचे शोषण केल्याचा आरोप तेथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर होत आहे. या अत्याचारांना राज्य सरकारच जबाबदार आहे, असा गंभीर आरोप या राज्याच्या राज्यपालांनी केल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाने या अत्याचारांविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. संदेशखाली येथील दलित आणि मागासवर्गीय महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना सध्या मोठा विषय बनून राहिल्या आहेत. येथील तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते रात्री बेरात्री तरुण महिलांना घरी बोलावितात आणि त्यांचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप येथील पिडीत महिलांनीच केला असून त्या विरोधात त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने आंदोलन चालविले आहे. तथापि, राज्य सरकार त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असून राज्यकर्त्या पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घातले जात आहे, असा महिलांचा आरोप आहे. राज्यपालांनीही आता या भीषण घटनांमध्ये लक्ष घातले आहे.
भाजपची निदर्शने
संदेशखाली आणि परिसरात भारतीय जनता पक्षाने उग्र आंदोलन छेडले असून या पिडित महिलांना न्याय मिळाल्याशिवाय ते मागे घेणार नाही, अशी घोषणा केली आहे. राज्यातील पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. अधिकारी यांनी संदेशखालीला भेट देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाकडून रोखण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून चौकशी
येथे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. राज्य सरकारच्या तपासकार्यावर आता जनतेचा विश्वास उरलेला नाही. राज्याची यंत्रणा गुंडांना पाठींबा देण्यात मग्न आहे, असा आरोप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी पत्रकारांसमोर केला.
सूत्रधार फरार
या अत्याचार आणि लैंगिक शोषण प्रकरणांचा सूत्रधार शहाजहान नावाचा असून तो तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. त्याने काही दिवसांपूर्वी संदेशखालीत दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. तसेच दलित आणि मागावर्गीय यांच्या महिलांचे लैंगिक शोषण करण्याबरोबरच त्याची भूमी आणि घरेही गुंड ताब्यात घेत आहेत, असा आरोप आहे. हा नेता सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.