मान्सूनन पुढे सरकरला, चिंतेचे ढग मिटण्याची चिन्हे
पुणे : पावसाने ताण दिल्याने राज्यात चिंतेची निर्माण झाली असतानाच हळूहळू सकारात्मक चित्र निर्माण होताना दिसत आहे. रेंगाळलेला मान्सून पुन्हा एकदा पुढे सरकण्यास सुरूवात झाली असून, 19 जूनपासून राज्यात पाऊस जोर धरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार, तर मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात मोसमी पावसाचे वारे नियोजित वेळेच्या तीन दिवस उशिरा आले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. मान्सूनचे आगमन होऊन आठवडा उलटत आला, तरी पावसाचे चिन्ह नसल्याने राज्यभर चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, रेंगाळलेला मान्सून पुढे सरकल्याने पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी मान्सूनने संपूर्ण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा व्यापत विदर्भापर्यंत मजल मारली. मान्सूनने महाराष्ट्र व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मान्सून सरासरी 15 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. मात्र यंदा त्यास विलंब झाला आहे. 19 जूनपासून राज्यात पाऊस जोर धरणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याने आता त्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण आहे. मात्र पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली स्थिती अद्यापही तयार झालेली नाही. मात्र दोन दिवसांत अरबी समुद्रातील महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती आणि उत्तर मध्य आणि दक्षिन गुजरातसून ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रावात तयार होणार आहे. त्यामुळेच राज्यात कोकणासह, घाटमाथा, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात 26 जूनपर्यत पाऊस हजेरी लावणार आहे. मात्र, पाऊस पडण्याचे प्रमाण कमी जास्त राहण्याची शक्मयता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनने महाराष्ट्र व्यापला
19 जूनच्या आसपास अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती, तर उत्तर मध्य आणि दक्षिण गुजरातपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यत हवेच्यावरच्या भागात चक्रावात तयार होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे 19 ते 26 जूनदरम्यान राज्यात पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.