ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विधानावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं विधान वैयक्तिक असून, आम्ही त्यांच्याशी सहमत नाही. मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान नाकारता येणार नाही. मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. बाळासाहेबांचं योगदानही सर्वश्रुत आहे. मराठी माणसामुळे मुंबईला वैभव, लौकिक प्राप्त झाला. उपमुख्यमंत्र्यांनीही भूमिका स्पष्ट केली, राज्यपालांनी खुलासा दिला आहे. राज्यपाल हे घटनेतील मोठं पद आहे. ते राज्याचं मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई उभी राहिली आहे. मुंबईमध्ये परराज्यातील लोक सुद्धा रोजगारासाठी आली आहेत. मुंबईची जी क्षमता आहे, ती मराठी माणसांमुळे आहे. मराठी माणसांनी मुंबईची अस्मिता जपली आहे. त्या अस्मितेचा कुणीही अवमान करू नये. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, त्यांनी शिवसेनाही मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी उभी केली आहे.
हेही वाचा : राज्यपालांना आता कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय