नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष : पिरनवाडी येथील नागरिक अक्षरशः वैतागलेत
वार्ताहर/किणये
तालुक्यात शुक्रवारी वसुबारसपासून गाईच्या पूजनाने दिवाळी सणाच्या पर्वाला सुरुवात झाली. सर्वत्र स्वच्छता, विद्युत रोषणाई, बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी आणि उत्साहाचे, आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पिरनवाडी परिसरात मात्र कचऱयाच्या दुर्गंधीमुळे नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. कचऱयाच्या दुर्गंधीमुळे आम्ही दिवाळी साजरी कशी करायची, असा सवाल स्थानिकांतून व्यक्त होत आहे.
पिरनवाडी येथील नाल्याजवळ कचऱयाचा ढिगारा साचलेला आहे. या ठिकाणी 150 ते 200 फुटापर्यंत कचऱयामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. स्थानिकांना घरामध्ये राहणेसुद्धा मुश्कील बनले आहे. सर्वत्र दिवाळीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत असताना आम्हाला मात्र दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे, अशी माहिती परिसरातील स्थानिकांनी दिली आहे.
पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला खरा, यामुळे साहजिकच गावचा विकास होणार आहे. मात्र इथल्या कचऱयाची समस्या सोडविण्याकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
ठिकठिकाणी कचराकुंडी बसविण्याची मागणी
पिरनवाडी गावचा विस्तार अलीकडे झपाटय़ाने वाढलेला आहे. त्यामुळे विविध प्रकारची दुकानेसुद्धा आहेत. या दुकानांमधील केरकचरा तसेच प्लास्टिक बॉटल्स, चिकन व मटण दुकानातील टाकाऊ पदार्थ या नाल्याच्या जवळ टाकण्यात येऊ लागला आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांसह नागरिकांना या दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे.
नगरपंचायतीतर्फे येथील कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच ठिकठिकाणी कचराकुंडी बसविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.