अभिनेते आदिल हुसेन यांचे मत
प्रतिनिधी /पणजी
भारतीय चित्रपटसृष्टीचे नायक, दिग्गज निर्माते आणि कथाकार सत्यजित रे यांच्या लघुकथेवर आधारित ’द स्टोरीटेलर’ हा चित्रपट म्हणजे साहित्य चोरीच्या विरोधात एक मजबूत संदेश आहे, असे मत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते आदिल हुसेन यांनी व्यक्त केले.
द स्टोरीटेलर ही सत्यजित रे यांना विनम्र आदरांजली आहे, असे हुसेन यांनी पुढे सांगितले. 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, इंडियन पॅनोरमा फीचर फिल्मचे कलाकार आणि अन्य सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा चित्रपट सत्यजित रे यांच्या लघुकथेवर आधारित आहे.
प्रत्येक अभिनेत्याने स्वतःला कथा व पात्रात गुंतवावे : आदिल
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आदिल यांनी, प्रत्येक अभिनेत्याने स्वतःला कथा आणि पात्रात गुंतविण्यासाठी छोटय़ा-मोठय़ा व्यक्तींचा अभ्यास केला पाहिजे. पात्रांसाठी सहानुभूती निर्माण करणे हा अभिनेत्याचा सर्वात मोठा गुण आहे, असे ते म्हणाले.
साहित्यिक चोरीवरील चर्चेला जोडून बोलताना आदिल यांनी, ‘कार्मिक कायद्यानुसार तुम्हाला जे काही आपणाला मोफत मिळते, त्याचे परिणाम खात्रीने भोगावे लागतात. त्यामुळे तुम्हाला मिळालेले कोणतेही उत्पादन किंवा सेवेसाठी, मग ती कला असो वा अन्य काही, एकतर तुम्ही पैसे द्यावे किंवा निर्मात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कॉपीराइटच्या मुद्याला सामोरे जाण्यासाठी हा आधारभूत सिद्धांत असला पाहिजे, असे आदिल म्हणाले.
कॉपीराइट ही आज एक आव्हानात्मक समस्या : चॅटर्जी
अभिनेत्री तनि÷ा चॅटर्जी यांनी बोलताना, सध्या केवळ सिनेमाच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात कॉपीराइट ही एक आव्हानात्मक समस्या बनली आहे, त्यामुळे साहित्य चोरी टाळली पाहिजे, असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, एक कलाकार म्हणून कला ही मुक्त असावी, असे आपणास वाटत असले तरीही आजच्या जगात जिथे चित्रपट क्षेत्रात मोठा व्यापार होतो, तेथे कोणाच्यातरी निर्मितीच्या मौलिकतेचा आदर करणे ही कलाकार मंडळीची जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या.
अन्य एका प्रश्नावर बोलताना चटर्जी यांनी, कलाकार आणि प्रेक्षकांना स्वतःला प्रश्न विचारायला लावणे हा कलेचा उद्देश असतो. सिनेमा हा केवळ पैसा बनविण्यासाठी नव्हे तर जनजागृतीसाठीही असतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
’द स्टोरीटेलर’ बद्दल थोडक्यात
तारिणी बंडोपाध्याय हे एक स्टोरीटेलर. एकाच ठिकाणी नोकरीला चिकटून राहणे त्याच्या स्वभावात बसत नाही. त्यामुळे ते आयुष्यभर नोकऱया बदलत राहतात. त्यातूनच निवृत्तीपर्यंत त्यांनी 32 ठिकाणी नोकऱया केल्या. या व्यापात त्यांनी कधीच पत्नी अनुराधाला खास असा वेळ दिलाच नाही. तिच्यासोबत कधी सुट्टीही घालविली नाही. आता वयाच्या 60 व्या वषी ते कोलकात्यात निवृत्त होतात. आता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, परंतु त्यांच्या पत्नीचे निधन झालेले आहे. तसेच त्यांचे जवळचे असेही कुणीच त्यांच्या सोबत नाहीत. हीच खंत त्यांना सतावत आहे.
हा चित्रपट सोमवारी इफ्फीत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटात परेश रावल, आदिल हुसेन, तनिष्ठा चॅटर्जी, रेवती, जयेश मोरे या कलाकारांच्या भूमिका आहेत.