केवळ 100 फूट रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे रेल्वेखाते-कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष
बेळगाव : रेल्वेस्टेशन ते पोस्ट कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे रेल्वेखात्याच्यावतीने डांबरीकरण करण्यात आले. मात्र केवळ 100 फूट रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे रेल्वेखात्याने दुर्लक्ष केले आहे. परिणामी पोस्टमन चौकात खड्डे निर्माण झाले आहेत. कॅन्टोन्मेंटनेदेखील कानाडोळा केल्याने एका शाळकरी मुलानेच चौकातील खड्डय़ांमध्ये दगड-माती घालून बुजविले आहेत. त्यामुळे या मुलाच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पोस्टमन चौकात निर्माण झालेले खड्डे धोकादायक आहेत. हे लहान मुलांनादेखील कळू लागले आहे. पण पदवी संपादन करून अभियंते बनलेल्या रेल्वे आणि कॅन्टोन्मेंटच्या अभियंत्यांना कधी शहाणपण येणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पोस्टमन चौकातील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. रेल्वेस्टेशन ते पोस्टमन चौकापर्यंतचा रस्ता खराब झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून केवळ पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र केवळ 100 फूट रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्याची मोहीम राबविताना कॅन्टोन्मेंटनेदेखील रेल्वे खात्याच्या अखत्यारित येणारे पोस्ट कार्यालयासमोरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे खड्डे वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत. मात्र आता चौकातील सर्व खड्डे वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. याकडे कॅन्टोन्मेंट आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
कॅन्टोन्मेंटचे अधिकारी कधी जागे होणार?
या खड्डय़ांमुळे दुचाकी वाहनांचे अपघात घडत आहेत. त्यामुळे एका शाळकरी मुलानेच खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला. परिसरात टाकण्यात आलेल्या विटा आणि माती खड्डय़ांमध्ये घालून खड्डे बुजविले. या शाळकरी मुलाच्या कार्याबद्दल समाजमाध्यमांवर कौतुक करण्यात येत आहे. पण कॅन्टोन्मेंटचे अधिकारी कधी जागे होणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.