अनमोड खानापूर बससेवेला प्रारंभ : शालेय विद्यार्थ्यांकडून समाधान
वार्ताहर /खानापूर
लोंढा, खानापूर, तिनईघाट व्हाया रामनगर ही बससेवा सुरू झाल्याने लोंढा परिसरातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. लोंढा, तिनईघाट, अनमोड परिसरातील विद्यार्थ्यांना लेंढा येथे शिक्षणासाठी जंगलातून पायपीट करावी लागत होती. रेल्वे रुळावरून धोकादायक प्रवास करून यावे लागत होते. याबाबत भाजप राज्य महिला मोर्चाच्या सदस्या धनश्री सरदेसाई यांनी नुकताच खानापूर आगार प्रमुखांना खानापूर, अनमोड बससेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. याची दखल घेऊन खानापूर-अनमोड ही बससेवा सुरू करण्यात
आली.
अनमोड परिसरातील अस्तोली, राजवाळ, गवळीवाडा, अक्राळी कुराडवाडा, गवेगाळी आदी गावांतील विद्यार्थी लोंढा येथे सहावीपासून शिक्षणासाठी येत असतात. मात्र, बस सुविधा नसल्याने त्यांना पायपीट करावी लागत
होती.
खानापूर आगाराने खानापूर-अनमोड बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. सदर बस दररोज खानापूर बस आगारातून सकाळी 8 वाजता सुटून 9.30 पर्यंत तिनईघाट येथे पोहोचेल. तिथून पुन्हा 10 वाजता लोंढा येथे येणार आहे. ही बससेवा कायमस्वरुपी राहावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.