काँग्रेसची टीका, ढासळलेल्या प्रशासनाचा लोकांनी पर्दाफाश केल्याचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
‘प्रशासन तुमच्या दारी’ हे अभियान म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जनतेला मूर्ख बनवण्याचा केवळ एक स्टंट आहे, असा दावा गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केला आहे. या कार्यक्रमामुळे एक गोष्ट मात्र बरी झाली ती म्हणजे राज्याचे प्रशासन किती आणि कशाप्रकारे ढासळले आहे त्याचा संबंधित मंत्र्यांपुढे लोकांनीच पर्दाफाश केला, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत गोवा प्रभारी खासदार मणिकम टागोर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टॉन डिकॉस्ता, खासदार फ्रान्सिस सार्दिन व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आदींची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सरकारला आता लोकांच्या समस्या, प्रश्नांची जाणीव झाली असून स्वत:चे अपयश लपविण्यासाठी ‘प्रशासन तुमच्या दारी’ चे आयोजन करण्यात आले आहे. परंतु हा कार्यक्रम म्हणजे केवळ मतदानाचा अजेंडा आहे, असे श्री. आलेमाव म्हणाले.
आमदार फेरेरा यांनी बोलताना, संबंधित कार्यक्रमाबद्दल लोकांना आणि स्वत: आपणालासुद्धा शेवटच्याक्षणी सांगण्यात आले, असा आरोप केला. हा कार्यक्रम म्हणजे सरकारच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ चाच भाग असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीसंबंधी माहिती देताना श्री. टागोर यांनी, पक्षातर्फे यापुढील निवडणुकांमध्ये ज्येष्ठांबरोबरच तऊणांचीही फौज निर्माण करण्यावर एकमत झाल्याचे सांगितले. दोन्हींचे प्रमाण 50-50 टक्के असेल, त्याचबरोबर उमेदवारांची वयोमर्यादाही 50 वर्षांपेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त असा समतोल साधण्यात येईल, असे ते म्हणाले.
निवडणुकीत तऊणाईला संधी देणे ही काळाची गरज असल्याचे पक्षाला जाणवले असून तेच धोरण म्हणून स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात येणार असून सर्व निर्णय या समितीतर्फेच घेण्यात येतील, असे टागोर यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीत घेतलेल्या अन्य एका महत्वपूर्ण निर्णयानुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘हात से हात जोडो’ यात्रा गोव्यात अधिक व्यापक स्वऊपात पुढे नेण्याचा निर्धार केल्याची माहिती टागोर यांनी दिली.