मुबलक पाणीसाठा, पोषक वातावरणामुळे मत्स्य उत्पादनात होणार वाढ; राहु, गिरमळ, मृगळ, कटला जातीच्या माशांचे होणार उत्पादन
प्रतिनिधी /बेळगाव
माशांच्या उत्पादनासाठी मत्स्य खात्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या हंगामात खात्याने 10 हजार टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवषी 9 हजार टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्या तुलनेत यंदा 1 टनाची वाढ झाली आहे. मागील दोन वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हय़ात माशांचे उत्पादन वाढले आहे.
जिल्हय़ात जलाशय, नदी, तलाव, पाझर तलाव व इतर नैसर्गिक नाल्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, दोन वर्षात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने मत्स्योत्पादनाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय अनेक जलाशये, नदी आणि तलावातून पाण्याची पातळी टिकून असल्याने मत्स्यबिज (माशांची पिल्ले) सोडणे सोयीस्कर होत आहे.
जिल्हय़ात यंदाच्या पावसाळी हंगामात विविध जलाशये, नदी आणि तलावातून तब्बल 1 कोटी मत्स्यबिज (माशांची पिल्ले) सोडली जाणार आहेत. गतवषी 90 लाख मत्स्यबिज सोडले होते. त्या तुलनेत यंदा 10 लाखांनी वाढ होणार आहे. त्यामुळे साहजिकच मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा उन्हाळय़ात झालेल्या अति पावसामुळे सर्व जलाशये, तलाव आणि नद्यांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा मत्स्यबिज सोडण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. याकरिता खात्याने शिमोगा, चेन्नई व आंध्रप्रदेश येथून माशांची पिल्ले मागविली आहेत. विशेषतः राहु, गिरमळ, मृगळ, कटला आदी जातींची माशांची पिल्ले सोडली जाणार आहेत.
मत्स्य उत्पादकांना मिळणार माशांची पिल्ले
मत्स्य उत्पादक शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवषी सवलतीच्या दरात मत्स्यबिज (माशांची पिल्ले) दिली जातात. यंदा देखील मत्स्य उत्पादकांना मत्स्य बिजांचे वितरण केले जाणार आहे. दमदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर मत्स्य बिज वितरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. संबंधीत उत्पादकांनी रामतिर्थनगर येथील मत्स्यबिज खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत एक हेक्टरसाठी तब्बल सात लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. अलिकडे तलावात मत्स्य पालन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. अशा शेतकऱयांना ही योजना लाभदायक ठरणार आहे.
यंदा जिल्हय़ात मत्स्यबिज अधिक प्रमाणात सोडले जाणार आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. मुबलक पाणीसाठा असणाऱया जलाशय, नदी आणि तलावातून माशांची पिल्ले सोडली जातील. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर माशांची पिल्ले सोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याबरोबर शेतकऱयांनाही माशाची पिल्ले वितरित केली जाणार आहेत.
– एम. व्ही. कुलकर्णी (सहाय्यक संचालक मत्स्य खाते)