जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ : पिरनवाडी येथे गांधी भवनाचा लोकार्पण सोहळा
वार्ताहर /किणये
महात्मा गांधीजींचे आचार आणि विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांनी दिलेली सत्य, शांती आणि अहिंसा ही शिकवण देशाच्या हितासाठी महत्त्वाची आहे, असे मनोगत जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पिरनवाडी येथे व्यक्त केले.
माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने पिरनवाडी येथे उभारण्यात आलेला गांधी भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवारी मोठय़ा थाटात झाला. यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ बोलत होते. पूर्वी मोबाईल किंवा सोशल माध्यमे नव्हती, तरीही काश्मीरपासून कन्याकुमारी असा संपूर्ण प्रदेश जनजागृती करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यपूर्वकाळात व स्वातंत्र्यानंतरही त्यांचे योगदान देशासाठी महत्त्वाचे असल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता असे म्हणून आपण त्यांचा आदर करतो, असेही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी म्हटले.पालकमंत्र्यांच्या हस्ते गांधी भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळय़ाच्या स्वागतासाठी बैलहोंगल येथील पारंपरिक ढोलवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे गुरुनाथ कडबूर आदींसह विविध क्षेत्रातील अधिकारी, पिरनवाडी भागातील आजी-माजी ग्राम पंचायत सदस्य, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
पिरनवाडीतील गांधी भवनासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नामफलकाचे उद्घाटन व गांधीजींच्या मूर्तीचे पूजनही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. पिरनवाडी गावातील नागरिकांचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी कंत्राटदार व महात्मा गांधीजींची मूर्ती बनविलेल्या मुर्तिकारांचाही विशेष सत्कार करण्यात आला.