सरसंघचालकांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ कोलकाता
नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाच्या वैभवसंपन्नतेसाठी कार्यरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील देशाच्या समृद्धीसाठी काम करत असल्याचे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी रविवारीच माझे वडिल आणि संघाची विचारसरणी वेगवेगळी असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भागवत यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे डाव्या विचारसरणीचे होते. तर संघ हा उजव्या विचारसरणीचा पाईक आहे. दोन्ही विचारसरणी परस्परांशी मेळ दर्शविणाऱया नसल्याचे अनिता बोस म्हणाल्या होत्या.
सरसंघचालक यांनी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेला आहे. संघाकडून धर्मतला येथील शहीद मिनार येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत हे मागील 5 दिवसांपासून कोलकाता दौऱयावर आहेत.
संघ जगाला देतो ‘धर्म’
भारत काय आहे? भारत एक अमर राष्ट्र आहे. भारत पूर्ण जगाला धर्म देतो, रिलिजन नव्हे. नेतृत्वासाठी पूर्ण जग भारताच्या दिशेने पाहत आहे, याकरता आम्हाला अनुकरणीय व्हावे लागणार असल्याचे भागवत म्हणाले.
नेताजींचे स्वप्न पूर्ण करतोय
भारताला महान करण्याचे नेताजींचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हा सर्वांना काम करावे लागणार आहे. सर्व जग भारताच्या दिशेने आशेने पाहत आहे. नेताजी बोस यांनी ‘तरुणेर स्वप्न’ या पुस्तकात 1924 पर्यंतचे स्वतःचे विचार नमूद केले आहेत. या पुस्तकाने नेताजींनी दाखविलेला मार्गच आम्ही अनुसरत आहोत. संघाचे कार्य आणि नेताजींचे विचार सारखेच आहेत. भारतवर्ष पृथ्वीचे एक रुप आहे. जगाच्या सर्व समस्या संपवायच्या असून आम्ही त्याच मार्गावर वाटचाल करत आहोत असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.
संघ मोठा परिवार
नेताजी बोस यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. नेताजींनी कधीच स्वार्थ पाहिला नाही. नेताजी बोस हे उच्चशिक्षित होते, ऐषोआरामाचे जीवन जगू शकत होते, परंतु त्यांनी देशासाठी वनवास पत्करला. नेताजी बोस यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. स्वतःचे जीवन देशासाठी समर्पित केल्याचे उद्गार भागवत यांनी काढले आहेत. दरवर्षी आम्ही नेताजी बोस यांच्या जयंतीनिमित्त अशाप्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करतो, बंगालमध्ये ही काही नवी बाब नाही. संघ आता एक मोठा परिवार झाला असून संघाला आता प्रत्येक जण ओळखत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.