मध्यान्ह आहारातील कटू सत्य समोर : पालकांनी अधिक सतर्क होण्याची गरज,शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती
पणजी : राज्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘मध्यान्ह आहारात’ भरड आणि पौष्टिक अन्न देण्याकडे सरकारचा कल असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक विद्यार्थ्यांना सामोसे, बटाटवडे यासारखे तेलकट पदार्थच जास्त आवडत असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. शाळेत मध्यान्ह आहार देण्यात येत असला तरी अनेक विद्यार्थी स्वत:च्या टिफिनमधून सामोसे, बटाटवडे यासारखे तेलकट तयार खाद्यपदार्थ घेऊन येतात. शाळेत मध्यान्ह आहार वितरित करण्यात येतो तेव्हा अन्य विद्यार्थ्यांसोबत तेही घेतात, मात्र नंतर ते पदार्थ बाकाच्या कप्प्यात वा अन्य ठिकाणी लपवून ठेवतात किंवा बाहेर फेकून देतात व स्वत: आणलेले सामोसे, बटाटवडेच खातात, असे दिसून आल्याचे शिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एका बाजूने सरकार शाळांमध्ये मध्यान्ह आहार योजनेत भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असताना अनेक विद्यार्थ्यांची रूची मात्र भलत्याच खाद्यपदार्थांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही पालकांनीच आपल्या मुलांना अशा ‘जंक फूड’ ची चटक लावली आहे. त्यामुळे मुलांची प्रवृत्ती त्या पदार्थांकडे वाढत आहे. हे पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात, तरीही मुलांना तेच आवडतात. भविष्यात वाढत्या वयात त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक पौष्टिक आहारास प्राधान्य दिले पाहिजे, असे सदर अधिकारी म्हणाला.