विजांच्या लखलखाटासह जिह्यात मुसळधार, मंडळाच्या आगमन मिरवणुकीत पळापळ
प्रतिनिधी/ सातारा
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होणाऱया गणरायाचे आगमन जल्लोषात होत होते. घरगुती गणपतीचे आगमनही झाले. परंतु सायंकाळी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे ढोल पथकांच्या कडकडाटात आगमन सुरू असतानाच अचानक विजांचा गडगडाट सुरू झाला आणि विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावत गणेशभक्तांच्या आनंदावर अक्षरशः पाणी फेरले. सातारा, कराडसह जिह्याला चांगलेच झोडपून काढले. सुमारे तासभर चौखूर पाऊस विजांच्या लखलखाटासह, ढगाचा गडगडाटात पावसाने धुऊन काढले. यामुळे चांगलीच त्रेधा गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची झाली. ढोल ताशाचा आवाज अचानक थांबला तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना आडोशाला उभे रहावे लागले. मूर्ती झाकण्यासाठी पळापळ झाल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, हवामान खात्याने अजून दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सातारा जिह्यात दोन वर्षानंतर होत असलेल्या गणेशोत्सवासाठी उत्साहाचे आनंदाचे वातावरण पहायला मिळत होते. बाप्पांच्या आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या आवाजात सुरू होत्या. दिवसभर उन्हाचे वातावरण सायंकाळी बदलले. सायंकाळी विजांचा लखलखाट सुरू झाला. ढगांचा गडगडाट होत जोरदार सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात झाली. या पावसामुळे शहरात निघालेल्या गणेश मंडळांच्या मिरणुकीतले काही ढोल ताशे बंद झाले तर काही उत्साही त्या पावसात ही वाजवत होते. तर काही कार्यकर्त्यांनी बाप्पांच्या मूर्ती झाकण्यासाठी कागद शोधण्यासाठी पळापळ केल्याचे चित्र दिसत होते. या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मिरवणुकीत गर्दी झालेले रस्ते पावसाने मात्र ओस झाले होते. हा पाऊस जिह्यातील सातारा, जावली, वाई, पाटण, कराड, कोरेगाव तालुक्यात झाला. दरम्यान, या पावसाने जिह्यातील धना, घेवडा, बलुरा या पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिह्यात सातारा, पाटण, वाई सह सर्वच तालुक्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
मुसळधार पावसाने कराडमध्ये मिरवणुकीत विघ्न
विघ्नहर्त्या गणरायाचे बुधवारी कराड शहरासह परिसरता जल्लोषी वातावरणात आगमन झाले. बहुतांशी सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी निघतात. मात्र सायंकाळी सात वाजता कराड शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम होता त्यामुळे अनेक मंडळांच्या आगमन मिरवणुका थांबल्या होत्या. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची, भाविकांचीही मोठी धांदल उडाली. रस्त्यावरील फुलविक्रेते, मूर्ती विक्रेत्यांची प्रचंड गैरसोय झाली.