वार्ताहर/ पाचगणी
महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा निसर्गरम्य परिसर होय. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील महत्वाच्या व उंच असलेल्या विल्सन पॉईंटवरील तीन बुरुजापैकी एक बुरुज ढासळला आहे.
महाबळेश्वरमधील महत्वाच्या असलेल्या विल्सन पॉईंटवरील बुरुज ढासळल्यामुळे त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी लेखी मागणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे यांनी वन विभागाकडे केली होती. विल्सन पॉईंट हा शहरातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच पॉईंट असून सदर मनोरे हे ब्रिटिशकालीन आहे. हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तसेच सूर्योदयाचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी तीन बुरुज बाडण्यात आले आहेत.
त्या बुरुजापैकी पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोऱयाचा आसमंत दिसतो. दुसऱया बुरुजावर सायंकाळी आल्यास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसऱया बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिसते.
आजही या बुरुजांमुळे विल्सन पॉईंटच्या सौंदर्यात भर पडते. अनेक नागरिक व पर्यटक या बुरुजांवर उभे राहून सूर्योदय व सूर्यास्ताचा देखावा आपल्या डोळ्यात तसेच कॅमेऱयात कैद करतात. तर हे मनोरे महाबळेश्वरच्या नागरिकांशी भावनेने जोडले गेले असून त्याकडे तत्काळ लक्ष देऊन दुरुस्त करून हा ऐतिहासिक नयनरम्य वारसा जपावा, अशी मागणी महाबळेश्वर बचाव आघाडीच्या वतीनेही करण्यात आली आहे.