ग्रामीण भागांबरोबरच काही शहरी भागांमध्येही दिसते चित्र. गावचे किंवा वाडय़ांचे एकत्रित गणेश विसर्जन. संघटितपणाचे घडते दर्शन. आरत्या, फुगडय़ात होतात सर्वजण सहभागी.
रविराज च्यारी. डिचोली
गणेश उत्सव म्हणजे ज्याप्रमाणे निसर्गदेवतेची पुजेचा उत्सव त्याचप्रमाणे गावागावांत घराघरांत संघटितपणाचे दर्शन घडवून आणणारा हा उत्सव आहे. सामाजिक पातळीवर ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना चालीस लावली त्याचप्रमाणे घरांमध्ये कुटुंब एकत्रित येऊन हा गणेश आजही साजरा करताना दिसत आहे. त्यापुढे गावचा एकोपा गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी दिसून येतो. एकत्रितपणे सर्व घरांमधील गणेश मूर्ती एका ठिकाणी जमा झाल्यानंतर त्यांचे सामूहिकरीत्या विसर्जन करण्याची प्रथा आणि परंपरा आजही कायम आहे.
गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण धरतीवर वेगळेच चैतन्य आणि मांगल्य आणणारा सण. या सणात सर्वजण एकत्रित येऊन तो साजरा करतात. घरांमध्ये वाडय़ांवर लोकांमध्ये एकमेकांबद्दल आकस हा अनेकदा असतो. परंतु या सणावेळी एकमेकांमधील वैरत्वाची भावना बाजूला ठेऊन सर्वजण या उत्सवात रममाण होत असतात. राज्यात आजही अनेक कुटुंबे आहेत. जी या जमान्यातही संघटितपणे संपूर्ण कुटुंबाचा एक गणपती पुजतात. त्यामुळे घरामध्ये उत्सवातील उत्साह मोठा पहायला मिळतो.
तसेच वाडय़ावर गावातही लोक एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाला बैलपत्र किंवा फुले वाहतात. त्या कारणाने घरातील लोकांशी बोलणे आणि काही विषयांवर चर्चा करणे या गोष्टी पहायला मिळतात. राज्यातील बहुतेक सर्वच गावांमध्ये हि प्रथा आहे. गावातील सर्वांच्या उत्साहात सहभागी होताना वातावरण मंगलमय ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपले योगदान देत असते.
हाच उत्साह आणि संघटितपणा सदैव गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळीही पहायला मिळतो. गावातील किंवा एखाद्या वाडय़ावरील सर्व गणेश मूर्ती एकत्रितपणे मागेपुढे विसर्जनस्थळी जातात. विसर्जनस्थळी जाण्यापूर्वी मंदिराच्या मंडपात किंवा मठात सर्वजणांनी जमणे आणि नंतर पुढे प्रस्थान करणे, किंवा सर्व गणेशमूर्ती एका रांगेत किंवा चौथऱयावर एकमेकांच्या समोर ठेवल्या जातात. या मूर्तींवर लोकांकडून लाह्या वाहिल्या जातात. पुरूष मंडळीकडून दारूकामाची आतषबाजीचा खेळ रंगतो. तर दुसऱया बाजूने महिला पुरूष एकत्रितपणे फुगडय़ा घालण्यात दंग झालेल्या दिसतात. अखेरीस सर्वजण एकत्रित बसून आरत्या सादर करतात आणि गावातील ठराविक व्यक्तीकडून गणरायाला सांगणे करून “सर्व वेडीवाकडी, क्षमतेनुसार केलेली सेवा मान्य करून घे, सर्वांचा सांभाळ कर आणि पुढच्या वषी लवकर या” असे साकडे घातले जाते.
“गणपती बाप्पा मोरया”च्या निनादात सर्व गणेश मूर्ती एक एक करून विसर्जन स्थळी तळी किंवा नदीवर जातात. गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतानाही गावातील तरूण मंडळी स्वतः पाण्यात उतरून एक एक मूर्ती स्वतःकडे घेऊन पाण्यात त्यांचे विसर्जन करतात. याही प्रसंगी प्रत्येकजण आपल्यातील मदतीची भावना जपताना दिसतो. हे चित्र मनाला अगदी समाधान देणारे असते. गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी सर्वांनी जमायचे आणि नैवेद्य म्हणून आणलेली पंचखाद्य सर्व उपस्थितांना वितरीत करायची. आणि गणपती बाप्पांचे आशिर्वाद मिळवायचे.
हि अशी प्रथा आणि परंपरा आजही गणेश विसर्जनात गावोगावी पहायला मिळते. या एकविसाव्या शतकातही लोकांनी हि परंपरा जपली आहे. आजच्या वेगवान युगात लोकांना आपल्या काम आणि धंदा यापुढे इतर कामांसाठी वेळच मिळत नाही. तरीही आपल्या प्रिय दैवत गणेशाच्या प्रेमाने प्रत्येक व्यक्ती सेवेसाठी आवर्जून वेळ काढत असतो. सर्वांबरोबर रममाण होऊन विसर्जन मिरवणूक, आरत्या, फुगडय़ांमध्ये सहभागी होत असतो. वर्षातून एकदा येणाऱया या उत्सवामुळे आपल्या गावातील, वाडय़ावरील लोकांमधील एकोपा आणि सौख्य दिसून येते. हा संघटीतपणा असाच अबाधितपणे राखून ठेवण्याचेही साकडे गणरायाला घातल असतात.