मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका, प्रवाशांची चार तास रखडपट्टी
प्रतिनिधी/खेड
गेल्या तीन दिवसापासून धुवाँधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गुरूवारी सकाळी 12 च्या सुमारास आंजणी-चिपळूण मार्गावर मातीमिश्रित दरड कोसळून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. मांडवी एक्स्पेससह अन्य ५ गाड्या वेगवेगळ्या स्थानकात उभ्या करण्यात आल्याने प्रवाशांना सलग चार तास रखडपट्टीला सामोरे जावे लागले. गुरूवारीही सकाळपासूनच पावसाचा जोर कायमच राहिल्याने आंजणी-चिपळूण मार्गावर मातीमिश्रित दरड रूळावर कोसळली. ही बाब रेल्वे प्रशासनाला कळवल्यानंतर दरड बाजुला करण्यासाठी शेकडो कामगार तातडीने तैनात करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
दुरुस्ती कालावधीत मुंबई-मडगाव मांडवी एक्स्पेस येथील रेल्वे स्थानकात अडकली. या मांडवी एक्स्पेसचे इंजिन काढून घटनास्थळी मदतकार्यासाठी नेण्यात आले. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबईला जाणाऱ्या मांडवी एक्स्पेसह सावंतवाडी-दिवा, हापा-मडगाव एक्स्पेस, एर्नाकुलम-मुंबई दुरांतो एक्स्पेस आदी रेल्वेगाड्या रखडल्याने हजारो पवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेच्या सहाय्याने रूळावर दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मार्ग पूर्ववत करण्यासाठी 4 तासांचा अवधी लागला. सायंकाळी 4.30 वाजता सर्वपथम मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. यावर्षी पावसामुळे पहिल्यांदाच रेल्वे प्रशासनाला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागल्याने रेल्वे प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे.
हे ही वाचा : Ratnagiri : परशुराम घाट केवळ अवजड वाहनांसाठी दिवसा खुला