भारतीय रेल्वे रचणार इतिहास ः रामेश्वरमच्या भाविकांना पाहता येणार इंजिनियरिंगचा चमत्कार
वृत्तसंस्था/ रामेश्वरम
दक्षिणेतील रामेश्वरम येथे जाणारे भाविक आगामी काळात रेल्वे इंजिनियरिंगच्या चत्मकाराचे साक्षीदार ठरणार आहेत. सुमारे 560 कोटी रुपयांच्या खर्चातून तयार होणाऱया पंबन पूलावर लिफ्ट प्रणालीचा वापर करत रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गावर 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने रेल्वे धावणार आहे. रामेश्वरम आणि धनुष्यकोटीला पुन्हा रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे.
हा पूल तयार झाल्यावर रामेश्वरमपर्यंत अनेक रेल्वेगाडय़ा सुरू होणार आहेत. धनुष्यकोडीत पूर्वी एक रेल्वेस्थानक होते, परंतु साठच्या दशकात आलेल्या एका भीषण चक्रीवादळात हे रेल्वेस्थानक आणि रेल्वेमार्गाचे नुकसान झाले होते. त्यानंतर त्याची निर्मिती करण्यात कुणीच स्वारस्य दाखविले नव्हते. 60 वर्षांनी पुन्हा एकदा या रेल्वेमार्गाची सुरुवात होणार आहे. या स्थानकाचे पर्यटन आणि धार्मिक दोन्ही दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्व आहे.
पंबन पूलासह नवा पूल
रेल्वेची योजना या स्थानकाचा पुनर्विकास आणि याला नव्या ब्रॉडगेज आणि इलेक्टिक मार्गाशी जोडण्याची आहे. रामेश्वरमपासून 18 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल. यामुळे येथील पर्यटकांची संख्या वाढणार अशी अपेक्षा असल्याचे मदुराई विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते आनंद यांनी म्हटले आहे. सध्या हा पूल 120 वर्षे जुना असल्याने यावरून केवळ एक रेल्वेच त्यावरून जाते. तसेच त्याचा वेग 10 किलोमीटर प्रतितास इतकाच असतो. जुन्या पंबल पूलावर मालगाडी धावत नव्हती. अशा स्थितीत सुरक्षा विचारात घेत रेल्वेने पंबन पूलासह नवा पूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
लिफ्ट प्रणालीचा अवलंब
पंबन पूलामध्ये लिफ्ट प्रणालीचा वापर करत याची पुनर्निर्मिती केली जात आहे. जेणेकरून जहाज येण्याच्या वेळी ते आपोआप वर जाईल. जहाज निघून गेल्यावर ते मूळपदावर येणार आहे. या प्रक्रियेत केवळ 10 मिनिटांचा वेळ लागणार आहे. जुना पंबन पूल समुद्रात तयार करण्यात आला आहे.
2 किमीपेक्षा अधिक लांबी
रेल्वे विकास निगम महामंडळाकडून तयार करण्यात येत असलेला हा नवा पूल सुमारे 2 किलोमीटरपेक्षा अधिक लांब आहे. या नव्या पूलात शेजर रोलिंग लिफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मोठी जहाजे पार व्हावीत म्हणून तो वर उचलला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान रेल्वेला वेग प्रदान करण्यासह अधिक भार वहन करण्याची क्षमता देणार आहे. हा पूल 100 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱयांचा मारा झेलण्यासह समुद्रातील शक्तिशाली लाटांना तोंड देऊ शकणार आहे.
धनुष्यकोडीपर्यंत पोहोचता येणार
हा पूल सुमारे 100 हून अधिक वर्षांपर्यंत टिकणार आहे. दक्षिण भारताला रामेश्वरमशी जोडणारा हा प्रमुख पूल आहे. या नव्या पूलाच्या निमिंतीनंतर भारताच्या भूमीतील अंतिम टोक असलेल्या धनुष्यकोडीपर्यंत भाविक सहजपणे पोहोचू शकतील. धनुष्यकोटी येथूनच रामसेतू सुरू होत श्रीलंकेपर्यंत जातो. येथून श्रीलंका समुद्रमार्गे 12 सागरी मैल अंतरावर आहे.