हैद्राबादच्या गोवळकोंडा तोफखाना परिसरात सराव
@ हैद्राबाद / वृत्तसंस्था
अग्नीवीरांच्या प्रथम तुकडीचे प्रशिक्षण हैद्राबादच्या गोवळकोंडा तोफखाना परिसरात केले जात आहे. हे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांचा समावेश भारतीय सेनेत केला जाणार आहे. 40,000 अग्नीवीरांची निवड झाली असून त्यांपैकी 5 हजारांहून अधिकांना हैद्राबाद येथे प्रशिक्षण दिले जात आहे.
या 5,000 हून अधिक प्रशिक्षणार्थींचे दोन विभाग करण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांना संगणकीय सिम्युलेटर्स आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष भूमीवर सराव आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना अत्यंत कष्टप्रद असे प्रशिक्षण दिले जाणार असून ते पूर्ण करणे ही त्यांच्या क्षमतेची कसोटी ठरणार आहे. प्रशिक्षण केंद्रात त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि वास्तव्याच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या गेल्या आहेत.
अग्नीवीर समाधानी
अनेक अग्नीवीरांनी या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. देशाचे संरक्षण करण्याची संधी आपल्याला मिळणार असल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजत आहोत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. प्रशिक्षणार्थींच्या या प्रथम तुकडीत भारताच्या अनेक राज्यांमधील अग्नीवीर आहेत.
कसे आहे प्रशिक्षण
अग्नीवीरांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या प्रारंभी सेनेच्या कार्यपद्धतीची पायाभूत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, गोळीबार, दूरसंचार आणि इतर महत्वाच्या पैलूंचा परिचय करुन दिला जाणार आहे. गोळीबाराचा विशेष सराव प्रत्येकाकडून करुन घेतला जाईल. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सामरिक उपकरणे कशी हाताळावीत आणि त्यांचा उपयोग कसा करावा, याची प्रात्यक्षिकांसह माहिती त्यांना दिली जाणार आहे. दुसऱया विभागातील प्रशिक्षणार्थींचा अभ्यास फेबुवारीत सुरु केला जाणार आहे. या दुसऱया विभागात साधारणतः 3,300 प्रशिक्षणार्थी असतील.
चार वर्षांचे प्रशिक्षण
सर्व अग्नीवीरांना चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यातील सर्वोत्तम 25 टक्के प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष भारतीय सेनेत सामावून घेतले जाणार आहे. जे भारतीय सेनेत समाविष्ट होऊ शकणार नाहीत, त्यांना इतर अनेक विभागांमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी सुविधा सज्ज
भारतीय सेनेच्या अधिकाऱयांनी या अग्नीवीरांना परिपूर्ण प्रशिक्षण देण्याची पूर्ण सज्जता केली आहे, अशी माहिती हैद्राबाद तोफखाना विभागाचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव चौहान यांनी दिली. प्रशिक्षणाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आखण्यात आला असून भारतीय सेनेत सेवा बजावण्यासाठी अग्नीवीरांना सज्ज करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. युवा पिढीचा तंत्रज्ञानाकडे असलेला ओढा पाहता पारंपरिक प्रशिक्षण पद्धतीत सुयोग्य असे परिवर्तन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया सुरळीत पार पडावी अशा प्रकारे तिची रचना करण्यात आली आहे. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक अग्नीवीराच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येईल, असे प्रतिपादन सेनाधिकाऱयांनी केले.