पुणे / वार्ताहर :
चाकण परिसरात आंबेठाण येथे शेतामधील एका खड्डयात पडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. रोहित जयकिशोर दास (वय 8) राकेश जयकिशोर दास (4) व श्वेता जयकिशोर दास (5) अशी मयत झालेल्या तीन मुलांची नावे असून, त्यांचे आईवडील मजूर आहेत. एकाचवेळी तीन मुलांचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी म्हाळूंगे पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंबेठाण येथील शेत नामेदव भिकाजी लांडगे यांच्या मालकीचे आहे. त्याजवळ भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर असून, त्याठिकाणी मजुरी काम करणारे किशोर जोगेश्वर दास हे कुटुंबासमवेत भाडय़ाच्या खोलीत राहण्यास आहे. मंगळवारी दास हे कामावर गेले असताना खड्डयातील पाण्यात पडून तिघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच, तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यानंती मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता पाठवले. एकाचवेळी कुटुंबातील तीन मुले गमावल्याने दास कुटुंबियावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दास कुटुंबीय मूळचे उत्तर भारतीय असून, कामानिमित्त ते आंबेठाण परिसरातील लांडगेवस्ती याठिकाणी राहण्यास आले आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले, तर मुलांची आई घरात चौथ्या एक वर्षाच्या मुलीस दूध पाजत होती. त्यावेळी आंघोळीच्या निमित्ताने तीन मुले शेतात साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ गेली आणि पाण्यात बुडाली. घटना घडून गेल्यानंतर खड्डय़ाजवळून कच्चा रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाला मुलांचे कपडे त्याठिकाणी आढळून आले. त्यानंतर मुले पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आले. शेतातील मुरुम काढण्यासाठी एक ते दीड वर्षापूर्वी हा चार ते पाच फुटांचा खड्डा खणला गेला होता.
हेही वाचा : भुशी धरणात वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला