विद्यापीठ प्रशासन सर्व महाविद्यालयांना एकच प्रश्नपत्रिका देणार : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ सज्ज : पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर प्रथम वर्षाला नियम लागू
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नवीन नियमानुसार प्रथम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठातील परीक्षा विभाग सर्वच महाविद्यालयांना पुरवणार आहे. परिणामी सर्व महाविद्यालयांची प्रश्नपत्रिका एकच असल्याने शैक्षणिक गुणवत्तेचेही मूल्यमापनही योग्य प्रकारे होईल. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाच्या परीक्षा होणार असून, महाविद्यालयांनी पेपर तपासणीनंतर विद्यापीठाच्या सिस्टमला विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदणी करायची आहे. निकाल मात्र विद्यापीठ जाहीर करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज झाले आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये यापूर्वी पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्षाची प्रश्नपत्रिका महाविद्यालय आपआपल्या पातळीवर तयार करून त्यानुसार परीक्षा घेत होते. परिणामी जेवढे कॉलेज तेवढय़ा प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका असायच्या. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या गुणदाणामध्ये एकसूत्रता नसयाची. प्रश्नपत्रिकेची काठिण्य़ पातळीही नियमानुसार नसायची. परिणामी काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणांचा फुगवटा, तर काहींना फारच कमी गुण मिळायचे. आता मात्र एकच प्रश्नपत्रिका असल्याने गुणदानही एकसारखे होईल, याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होईल. शिवाय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही वाढेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा एबीसीआयडी (ऍकॅडमिक बँक ऑफ क्रिडीटेस) काढला जाणार आहे. हा नियम बीटेक, एमटेक, एमफार्मा, लॉ, बीएड, शिक्षणशास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू केला जाईल. पदवी व पदव्युत्तरचे जवळपास 350 विषयांची परीक्षा सर्वसाधारण 60 हजार विद्यार्थी देणार आहेत. यंदा पदवी व पदव्युत्तर प्रथम तर पुढच्या वर्षीपासून व्दितीय वर्षाच्या परीक्षा नवीन शैक्षणिक धोरणानुसार होतील.
ऍकॅडमिक बँक ऑफ क्रिडीटेस म्हणजे काय?
नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होऊ नये याची काळजी घेतली आहे. प्रथम वर्ष पूर्ण केल्यास त्यांना एक वर्षाचे सर्टिफिकेट दिले जाणार आहे. दोन वर्षे पूर्ण केली तर डिप्लोमा आणि तीन वर्षे पूर्ण केली तर डिग्री दिली जाईल. याची अद्याप अंमलबजावणी नाही, परंतू भविष्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऍकॅडमिक बँक ऑफ क्रिडीटेस तयार केली जाणार आहेत. यामध्ये वर्ष किंवा सेमिस्टरवाईज क्रेडीट डिपॉजिट केले जातील. विद्यार्थी आपली डिग्री सात वर्षात पूर्ण करू शकतो. नियमानुसार क्रेडीट पूर्ण झाल्यावर विद्यार्थी आपली पदवी प्रमाणपत्र (डिग्री) घेऊ शकतो.
क्लस्टर कॅपचे नियोजन
नवीन नियमानुसार होणाऱ्या परीक्षांचे पेपर तपासणीसाठी क्लस्टर कॅपचे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, आदी विषयांचे वेगवेगळे कॅप सेंटर असणार आहे. क्लस्टर कॅप सेंटरचा प्रयोग यापूर्वीही शिवाजी विद्यापीठाने केला आहे. त्यामुळे क्लस्टर कॅप नवीन नसले तरी जुन्या पध्दतीचाच नवीन शैक्षणिक धोरणात नव्याने उपयोग केला जाणार आहे.
नवीन एसआरपीडीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवणार
शिवाजी विद्यापीठाने स्वतःची एसआरपीडी सिस्टम विकसित केली आहे. या एसआरपीडीच्या माध्यमातून महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका पाठवल्या जाणार आहेत. त्यामुळे पेपरफुटीचे प्रकार घडणार नाहीत, याची विद्यापीठ प्रशासनाने काळजी घेतल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. तरीही विद्यापीठातील परीक्षा विभागाची प्रत्येक महाविद्यालयावर नजर असण्याची गरज असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
पुनःपरीक्षांची खिरापत नकोच
कोरोना कालावधीमध्ये परिस्थितीनुसार विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या. यामध्ये हजारोंच्या संख्येने गैरप्रकार उघडकीस आले, तर काहींनी सिस्टम ओपन होत नसल्याचे कारण देत पुनःपरीक्षेची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या दबावाला बळी पडत, विद्यार्थी हिताच्या नावाखाली अनेकवेळा पुर्नपरीक्षा घेण्यात आल्या. याचा आर्थिक फटका, मानसिक त्रास विद्यापीठ प्रशासनाला सहन करावा लागला, हे खरे आहे. परंतू नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन घ्यावात. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर पुर्नपरीक्षांची खिरापत देऊ नये, अशी भावना नाव न सांगण्याच्या अटीवर शिक्षण तज्ञांकडून व्यक्त होत आहे.