शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांची गैरसोय
वार्ताहर /अगसगे
अगसगे येथील जलशुद्धीकरण यंत्र गेल्या दोन वर्षांपासून ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे नादुरुस्त अवस्थेत पडले आहे. यामुळे ग्रामस्थांवर शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थांतून ग्राम पंचायतीच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून ग्रामीण भागामध्ये जलशुद्धीकरण यंत्रे गावोगावी बसवण्याची योजना केली आहे. याची जबाबदारी ग्राम पंचायतीला देण्यात आली आहे. मात्र, ग्राम पंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच सरकारचा निधी वाया गेला असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.
गेल्या दोन वर्षापासून येथील जलशुद्धीकरण यंत्र बंद अवस्थेत आहे. असे असताना ग्राम पंचायतीने जलशुद्धीकरण यंत्रासमोर सुमारे एक लाख रुपयांचा निधी खर्च करून थोडय़ाच जागेत पेव्हर्स बसविण्यात आले आहेत.
जलशुद्धीकरण दुरुस्तीची मागणी
निधी लाटण्याच्या उद्देशाने ग्राम पंचायतीने ही नामी शक्कल लढवून निम्मा निधी हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. तरी ग्राम पंचायतीने याची त्वरित दखल घेऊन जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.