मनपाने दिली वर्कऑर्डर
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका हद्दीतील ओल्या कचऱयाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात तीन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन निविदा काढल्या होत्या. खासबाग निवारा केंद्र, नेहरूनगर इंदिरा कँटीन आणि एपीएमसी आवार अशा तीन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, यापैकी एपीएमसीऐवजी अन्यत्र बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे.
दररोज 250 टनांहून अधिक कचरा जमा होत आहे. ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. सध्या ओला आणि सुका कचरा वेगळा करून घेतला जातो. तरीही विघटनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होत आहेत. कचरा वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी वर्षाला 25 कोटींहून अधिक खर्च होत आहेत. त्यामुळे खर्चात कपात करण्यासह कचऱयापासून वीजनिर्मिती आणि गॅसनिर्मिती करण्याच्यादृष्टीने तीन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
खासबाग येथील निवारा केंद्रात जेवण बनविण्यासाठी गॅसपुरवठा करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. नेहरूनगर येथील इंदिरा कँटीन परिसरात बायोगॅस प्रकल्प राबवून इंदिरा कँटीनला गॅसपुरवठा करण्याचा विचार आहे. एपीएमसी भाजी मार्केट सुरू झाल्याने येथे कचऱयाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे एपीएमसीत बायोगॅस प्रकल्प राबवून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करून पथदिपांसाठी विजेचा उपयोग करण्याचा प्रस्ताव होता. याकरिता महापालिकेने निधीची तरतूद करून निविदा मागविल्या होत्या. या निविदा पात्र ठरल्या असून बायोगॅस प्रकल्प राबविण्यासाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे.
यापैकी एपीएमसीमधील भाजीमार्केट गांधीनगर येथे स्थलांतर झाल्याने कचऱयाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एपीएमसीऐवजी अन्यत्र बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा विचार महापालिका प्रशासनाने चालविला आहे. मात्र, खासबाग निवारा केंद्र आणि नेहरूनगर इंदिरा कँटीन येथील बायोगॅस प्रकल्प उभारणीच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.