भितींचे बांधकाम, गिलाव्याचे काम व्यवस्थित होत नसल्याची नागरिकांची तक्रार : कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेमधून कलामंदिरच्या जागेत बहुमजली क्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून न्यायप्रविष्ट भाग वगळून व्यापारी संकुलाचे काम करण्यात येत आहे. मात्र इमारतीचे बांधकाम आणि गिलाव्याचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. कोटीचा निधी खर्च करण्यात येत असून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
कलामंदिरच्या जागेत बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 43 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. कलामंदिर सभागृहाची दुरवस्था झाल्याने व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता. याबाबत बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला होता. पण निधीअभावी हा प्रस्ताव मार्गी लागला नव्हता. मात्र हा प्रस्ताव साकारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली असल्याने हा प्रकल्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रकल्पात विविध तरतुदी
क्यापारी गाळे, सभागृह, दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता पार्किंग सुविधा तसेच चित्रपटगृह अशा विविध तरतूदी या प्रकल्पात करण्यात आल्या आहेत. याठिकाणी खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. पण महापालिका प्रशासनाने कलामंदिर परिसरात असलेले गाळे, रहिवासी गाळे तसेच भाजी मंडईची जागा रिकामी करून दिली नसल्याने कामाला सुरूवात करण्यास विलंब झाला होता. तसेच काँग्रेस रोड रुंदीकरणातील विस्थापितांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली आहे. अशा विविध कारणांमुळे क्यापारी संकुलाच्या कामाला सुरूवात झाली नाही.
रितसर जागा हस्तांतर करून उपलब्ध असलेल्या जागेत काम सुरू करण्याचा आदेश तत्कालीन प्रशासक प्रादेशिक आयुक्त अंमलान बिस्वास यांनी दिला होता. त्यामुळे जागा हस्तांतर करून कामाला सुरूवात करण्यात आली होती. पण न्यायालयाने स्थगिती दिलेले गाळे अद्याप हटविण्यात आले नाही. मात्र अन्य इमारती हटवून जागा मोकळी करून इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम युद्धपातळीवर सुरू असून निम्म्याहून अधिक काम झाले आहे. सध्या भिंती बांधण्याचे आणि गिलावा करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र सदर काम व्यवस्थित होत नसल्याची टीका नागरिक करीत आहेत. सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने गिलावा करण्यात आलेल्या भिंती पांढऱया दिसत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे सदर कामाच्या दर्जाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.